मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता एका टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. या युद्धाची झळ जागतिक व्यापाराला बसू लागली असून, भारताने आपल्या आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) भारतात येणाऱ्या तेल आणि वायू टँकर्सच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने आपल्या शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत.
दोन 'टास्क फोर्स' सज्ज
advertisement
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने या मोहिमेसाठी दोन विशेष 'टास्क फोर्स' तैनात केल्या आहेत. पर्शियन आखातातून भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग प्रदान करणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित मदत करणे, ही या युद्धनौकांची मुख्य जबाबदारी असेल. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे समुद्रमार्गे होणारा भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत गस्त वाढवली
भारतीय नौदलाची जहाजे आधीच 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत या संवेदनशील प्रदेशात तैनात आहेत. मात्र, ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना 'एस्कॉर्ट' (संरक्षण) देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे आणि इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने तणाव वाढला आहे.
