या घटनेनंतर साध्वी प्रेम बाईसांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे काहीतरी गंभीर कट असल्याचा संशय बळावतो आहे. पोलिस तपासही सध्या याच दिशेने फिरतो आहे. या संशयामागे तीन ठळक कारणं सांगितली जात आहेत.
पहिलं कारण: मृत्यूनंतर जवळपास तीन तासांनी सोशल मीडियावर पोस्ट झालेलं कथित सुसाइड नोट
दुसरं कारण: सुमारे सहा महिन्यांपूर्वी व्हायरल झालेला साध्वींचा वादग्रस्त खासगी व्हिडीओ
advertisement
तिसरं कारण: मृत्यूपूर्वी दिलेलं संशयास्पद इंजेक्शन
या तिन्ही मुद्द्यांभोवती साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ फिरत असल्याचं चित्र आहे. जोधपूरच्या बोरानाडा पोलिसांनी एफआयआर नोंदवली असली, तरी नेमकं सत्य समोर यायचं अजून बाकी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते जुलै 2025 पासून.
जुलै 2025: व्हायरल व्हिडीओने उडवलेली खळबळ
13 जुलै 2025 रोजी साध्वी प्रेम बाईसांचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ जोधपूरमधील साधना कुटीर आश्रमातील असल्याचा दावा करण्यात आला. व्हिडीओवरील टाइमस्टॅम्पनुसार, हा व्हिडीओ 8 जानेवारी 2021 रोजी रात्री 10:22 वाजताचा होता.
या फुटेजमध्ये साध्वी एका खोलीत पलंगावर दिसतात. त्यांच्याशी एक महिला बोलताना दिसते. काही वेळातच भगव्या वस्त्रातील, डोक्यावर पगडी घातलेला एक पुरुष खोलीत येतो. तो साध्वींच्या गालावर हात फिरवतो, त्यांना जवळ घेतो आणि काही क्षणांसाठी उचलूनही धरतो.
या दृश्यांनंतर सोशल मीडियावर साध्वींच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मात्र व्हिडीओमधील व्यक्ती साध्वींचे गुरु वीरमनाथ असल्याचं समोर आलं. साध्वी त्यांना वडिलांसमान मानत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं.
तरीही या व्हिडीओमुळे साध्वी आणि त्यांच्या गुरूंच्या नात्यावर संशयाची सावली पसरली. या प्रकरणानंतर साध्वींनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आश्रमातील काही कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज चोरून बदनामीच्या उद्देशाने व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. एवढंच नाही तर हा व्हिडीओ न पसरवण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचाही दावा त्यांनी केला होता.
या घटनेमुळे साध्वींची प्रतिमा, आश्रमाची प्रतिष्ठा आणि धार्मिक कार्यक्रमांवर मोठा परिणाम झाला. अनेक कथाकथनांचे करार रद्द झाले. मानसिक तणाव इतका वाढला की, साध्वींनी आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेची मागणीही केली होती.
मृत्यूनंतर पोस्ट झालेलं सुसाइड नोट
या सगळ्या पार्श्वभूमीवर साध्वींच्या मृत्यूनंतर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट समोर आली. या पोस्टमध्ये त्यांनी सनातन धर्मासाठी आयुष्य जगल्याचं, अन्यायाविरुद्ध लढल्याचं आणि मृत्यूनंतर न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की साध्वींचा मृत्यू सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला, तर ही पोस्ट रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. म्हणजेच मृत्यूनंतर जवळपास तीन तासांनी. त्यामुळे हा मजकूर खरोखरच साध्वींनी लिहून आधीच शेड्यूल केला होता का, की त्यांच्या मृत्यूनंतर कुणीतरी तो पोस्ट केला हा संशय निर्माण झाला आहे.
इंजेक्शन आणि मृत्यूचा थेट संबंध?
पोलिस तपासानुसार साध्वी गेल्या दोन दिवसांपासून आजारी होत्या. बुधवारी संध्याकाळी आश्रमातच एका कंपाउंडरला बोलावून इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. हात-पाय सुटले, श्वासोच्छवास अडखळला आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रॉट डेड’ घोषित केलं.
हे इंजेक्शन नेमकं कोणतं होतं, कुणी दिलं, ते वैद्यकीयदृष्ट्या योग्य होतं का याची चौकशी सुरू आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनच स्पष्ट होईल की औषधाच्या रिअॅक्शनमुळे मृत्यू झाला की विषारी इंजेक्शन देण्यात आलं.
CCTV कॅमेरे हटवले, संशय अधिक गडद
तपास सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. साध्वींच्या साधना कुटीर आश्रमातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत. हे कॅमेरे कुणाच्या आदेशावरून हटवले आणि नेमक्या कोणत्या वेळेस याचा तपास पोलीस करत आहेत. पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतो आहे.
पोस्टमॉर्टेमवरूनही वाद
साध्वींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला पोस्टमॉर्टेमला विरोध केल्याची चर्चा आहे. समाजाच्या दबावानंतरच ते तयार झाले. यावरून साध्वींचे अनुयायी, कुटुंबीय आणि गुरु वीरमनाथ यांच्यातही वाद झाले.
