पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी एक मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. IANS–MATRIZE या सर्वेक्षण संस्थेच्या ताज्या अंदाजानुसार या निवडणुकीत एनडीए सरकार पुन्हा सत्तेत परत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेच्या आकडेवारीनुसार एनडीएला या वेळी मोठ्या बहुमताने विजय मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपासह जेडीयू या दोन्ही पक्षांना भारी प्रमाणात जागा मिळतील असा अंदाज आहे.
advertisement
एजन्सीच्या अहवालानुसार, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि त्यांना 83 ते 87 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर नीतीश कुमार यांच्या जेडीयूला 61 ते 65 जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, संपूर्ण एनडीए आघाडीला मिळून 153 ते 164 जागांचा आकडा गाठण्याची शक्यता सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीच्या दृष्टीने पाहता, एनडीएला एकूण 49% मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
दुसरीकडे महागठबंधनाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेनुसार लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला फक्त 62 ते 66 जागा मिळतील. तर संपूर्ण महागठबंधन फक्त 76 ते 87 जागांपर्यंत मर्यादित राहू शकते.
विशेष म्हणजे काँग्रेसला सर्वात मोठा तोटा होणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. काँग्रेसला फक्त 7 ते 9 जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डाव्या पक्षांपैकी सीपीआय(एम-एल) ला 6 ते 8 जागा, तर मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला 1 ते 2 जागा मिळू शकतात.
आधीच्या काही सर्व्हेंमध्येही एनडीएच्या पुनरागमनाचीच शक्यता व्यक्त झाली होती आणि या ताज्या सर्व्हेनं त्या अंदाजाला आणखी बळ मिळालं आहे.
जर हा ओपिनियन पोल प्रत्यक्ष निकालांमध्येही तसाच उतरला, तर याचा अर्थ नीतीश कुमार यांच्या कामकाजावर जनतेची पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल. नीतीश कुमार सलग २० वर्षांहून अधिक काळ राज्याचं नेतृत्व करत आहेत.
या सर्व्हेनुसार सर्वाधिक 22% मते आरजेडीला, तर 21% मते भाजपला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र सीट कन्व्हर्जनच्या बाबतीत भाजप पुढे राहील. कारण जेडीयू, लोजपा आणि इतर मित्रपक्षांचे बरेचसे मत भाजपच्या खात्यात ट्रान्सफर होत असल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे. तसेच सीटवाटपातली समन्वय आणि संघटनेतील शिस्त ह्या गोष्टींमुळेही एनडीएला या निवडणुकीत वाढती आघाडी मिळाली आहे, असा तज्ञांचा विश्वास आहे.
दरम्यान काँग्रेसला अधिक जागा दिल्यामुळे आरजेडीला फटका बसला, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. काँग्रेसला या निवडणुकीत 62 जागांवर उमेदवारी मिळाली आहे, आणि जर या सर्व्हेचे अंदाज खरे ठरले, तर याचा अर्थ आरजेडीने काँग्रेसला जास्त जागा देऊन आपले नुकसान करून घेतले असेल.
तज्ञांच्या मते हीच परिस्थिती उत्तर प्रदेशात 2017 मध्ये समाजवादी पक्षासोबतच्या आघाडीत दिसली होती. त्या वेळी सपाने काँग्रेसला 100 जागा दिल्या होत्या, पण फक्त 7 जागांवरच विजय मिळवता आला होता. त्यामुळे आरजेडीनेही यूपीसारखीच चूक केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
