800 वर्ष जुनी विहीर, पायऱ्यावर उभं राहिलं तर वाटेल राजवाड्यात आलो! महाराष्ट्रात कुठे आहे माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
साधी विहीर म्हणावं तर तिचं सौंदर्य पाहून क्षणभर राजवाड्यात उभं असल्याचा भास होतो. इतिहास अभ्यासकांच्या मते, या विहिरीचा कालावधी तब्बल 800 ते 900 वर्षांपूर्वीचा आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक ठेवे आजही शांतपणे आपला भूतकाळ जपून आहेत. त्यापैकीच एक अनोखी आणि दुर्लक्षित वास्तू म्हणजे दर्यापूर तालुक्यातील महिमापुर गावातील पायरी विहीर. साधी विहीर म्हणावं तर तिचं सौंदर्य पाहून क्षणभर राजवाड्यात उभं असल्याचा भास होतो. इतिहास अभ्यासकांच्या मते, या विहिरीचा कालावधी तब्बल 800 ते 900 वर्षांपूर्वीचा आहे.
advertisement
2/7
महिमापुर गावाच्या मध्यभागी असलेली ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नसून प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चौकोनी आकाराची आणि सुमारे 80 फूट खोल असलेली ही विहीर जवळपास 40 मीटर रुंद आहे. तिच्या भिंतींवर मध्यप्रदेशातून आणलेल्या तांबूस दगडाचा वापर करण्यात आला असून काही ठिकाणी काळ्या दगडाचाही समावेश आहे.
advertisement
3/7
प्रवेशद्वारावर कोरलेली नाजूक फुलांची नक्षी तिच्या सौंदर्यात अधिक भर घालते. या विहिरीचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तिची पायरी रचना. विहिरीत खाली उतरताना मध्येच थांबण्यासाठी विश्रांतीचे टप्पे तयार केलेले आहेत. आत गेल्यावर चारही बाजूंनी फिरता येईल अशी रचना करण्यात आली आहे.
advertisement
4/7
यामुळे ही विहीर केवळ उपयोगासाठी नव्हे, तर वास्तुकलेच्या दृष्टीनेही अत्यंत प्रगत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे या विहिरीमध्ये खोल्यांचीही रचना आढळते. दोन लहान आणि एक मोठी खोली आजही अस्तित्वात आहे. त्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी स्वतंत्र पायऱ्या देण्यात आल्या आहेत.
advertisement
5/7
या सर्व रचनेमुळे ही विहीर एखाद्या भूमिगत राजवाड्यासारखी भासते. या विहिरीच्या उगमाबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते ही विहीर देवगिरीच्या यादवकालीन आहे, तर काहींच्या मते ती बहामनी काळातील असावी. प्रा. डॉ. संतोष बनसोडे यांच्या मते, यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर या मार्गावर अनेक विहिरी बांधण्यात आल्या होत्या आणि महिमापुरची विहीर त्यापैकीच एक असण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
दरम्यान, या विहिरीतून विविध पुरातन वस्तूही सापडल्या आहेत. नंदीची मूर्ती, देवप्रतिमा आणि इतर काही अवशेष गावकऱ्यांनी बाहेर काढून मंदिरात ठेवले आहेत. काही स्थानिकांच्या मते, या ठिकाणी पूर्वी महिमा मातेचं मंदिरही होतं. सध्या त्या मूर्तीला स्वतंत्र मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे.
advertisement
7/7
इतकी समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी असूनही ही विहीर अद्याप पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे दिसत नाही. मात्र अलीकडच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. गावकरीही या वारशाचं जतन करण्यासाठी पुढाकार घेत असून, या अद्वितीय वास्तूला योग्य ओळख मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अमरावती/
800 वर्ष जुनी विहीर, पायऱ्यावर उभं राहिलं तर वाटेल राजवाड्यात आलो! महाराष्ट्रात कुठे आहे माहितीये का?