पुणे : अनेकजण हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. खूप वेळा प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नाही. अशा वेळेस आपला वेगळा मार्ग निवडतात आणि त्यात यशही मिळवतात. आज अशाच एका तरुणाची प्रेरणादायी आणि जिद्दीची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
सुशील काटकर असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरी शेती होती. पण शेतीतून येणार सगळा पैसे कर्जाचे व्याज फेडण्यात जात होता. त्यामुळे काटकर यांच्या आजोबांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती आणि त्यांच्या वडिलांवर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी होती.
advertisement
हे सगळं असताना पुण्यात येऊन सुशील यांनी MPSC ची तयारी तब्बल 9 वर्ष केली. मात्र, तरीही त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून कर्ज फेडले. त्यानंतर घर देखील घेतले. नेमका हा त्याचा प्रवास कसा झाला, एमपीएससीमध्ये अपयश आल्यावर त्यांनी त्यातून कशी मात केली, याबाबत त्यांनी लोकल18 शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेतात शॉक लागून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ, शेतकऱ्यांनी नेमकी काय घ्यावी काळजी?
आता काटकर यांचे पुण्यात दोन हॉटेल आहेत. काटकर यांनी गावी स्वतःचे घर बांधले तसेच सर्व कर्ज फेडले. विशेष म्हणजे त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठ येथील हॉटेलला "होय मी MPSC कर, काटकर बंधू" असे नावही दिले. हे नाव पाहून लोक आवर्जून पोहे खाण्यासाठी येतात. तर अनेकांसाठी काटकर यांचा प्रेरणादायी प्रवास आहे.
सुशील काटकर हे मूळचे बीड जिल्ह्यातील यवता या गावचे रहिवासी आहे. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यादरम्यान सुशील हे स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. तिकडे घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तरी वडील हे व्याजाने 5 ते 6 हजार रुपये पैसे पाठवत असत. परंतु त्यामध्येही सर्व खर्च हा भागात नव्हता. एमपीएससीची तब्बल 9 वेळा परीक्षा दिल्या. पण तरीही त्यात त्यांना यश आलं नाही.
शेवटी 2016 मध्ये अशी एक गोष्ट घडली की, गावाकडे गेलो आणि वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिथे गेल्यावर काही टेस्ट केल्या आणि त्याची फी 250 रुपये झाली. ती फी भरण्यासाठी वडील माझ्याकडे आणि मी वडिलांकडे पाहिलं. परंतु तेवढे ही पैसे भरायला नव्हते. अक्षरशः परिस्थितीवर रडायला येत होतं. तेव्हा ठरवलं की आपल्याला आता काही तरी केलं पाहिजे. मग त्यानंतर पुन्हा गावाकडून पुण्याला येत 2018 मध्ये प्री पास झालो. मग असं वाटलं की आता पूर्ण मेहनत घेऊन आयपीएस अधिकारी होऊन घरचं सगळं कर्ज आपण आता फेडू. परंतु त्यामध्ये ही अपयश आलं. ही सगळी तयारी करत असताना कधी कधी उपाशीच रहावं लागत असे, म्हणजे जगण्यासाठी संघर्ष हा सुरूच होता. मग ठरवलं की आता आपण दुसरं काही तरी केल पाहिजे.
लहान भाऊ आहे. त्याला घेऊन पुण्याकडे आलो आणि त्याला औरंगाबाद याठिकाणी गुलाब पोह्याचा एक स्टॉल टाकून दिला आणि पुण्यात मी 'होय मी MPSC कर काटकर' नावाने सदाशिव पेठ याठिकाणी व्यवसायाला सुरुवात केली. पहिले उत्पन्न हे 5 हजार रुपये मिळाले. त्यामुळे इतका आनंद झाला होता. तसेच पोह्याचा व्यवसाय करत 10 रुपयांत पोहे विकून 18 महिन्यात वडिलांचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडलं आणि घरही बांधलं. त्यामुळेच आता जर पाहिलं तर या सर्व परिस्थितीवर मात करत बाहेर पडत स्वतःचा व्यवसाय चांगल्याप्रकारे करत आहे, अशी माहिती सुशील काटकर यांनी दिली आहे. आलेल्या परिस्थितीत न खचता त्यांनी आपला मार्ग शोधला आणि त्यात यश मिळवले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.