कोणत्या बसेससाठी लागू होणार ई-बस पास?
ई-बससाठी घेतलेला महाग पास असलेले प्रवासी आता साध्या किंवा निमआराम एसटी बसमध्येही प्रवास करू शकतील. ज्यांच्याकडे निमआराम किंवा साध्या बसचा पास आहे, ते प्रवासी ई-बसने प्रवास करू इच्छित असतील, तर त्यांना दोन्ही सेवांमधील भाड्यातील फरक 100 टक्के दराने भरून प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा अधिक लवचिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
एसटीच्या या नव्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दररोज नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या राज्यात ई-बस प्रकल्पांतर्गत 448 बसेस कार्यरत आहेत तर शिवाई प्रकल्पांतर्गत आणखी 50 ई-बसेस रस्त्यावर धावत आहेत. पुढील काळात ही संख्या अधिक वाढविण्याचा महामंडळाचा मानस आहे.
पुणे विभागात सध्या 50 ई-शिवाई बसेस सेवेत आहेत. या बसेस प्रामुख्याने सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि बारामती या मार्गांवर प्रवास करतात. प्रवाशांच्या प्रतिसादावरून ही सेवा हळूहळू विस्तारली जात आहे. विशेष म्हणजे ई-बस सेवेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सध्या 50 टक्के सवलतीचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या सेवेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,ई-बस प्रकल्पामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत नवा बदल घडत आहे. पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळत आहे. पास सवलत योजनेमुळे ई-बस सेवेकडे प्रवाशांचा ओढा अधिक वाढेल आणि एसटी महामंडळाची आर्थिक स्थितीही सुधारेल.
राज्यातील ई-बस सेवा सध्या पर्यावरणपूरक, कमी आवाजातील आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचा उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. या योजनेमुळे प्रवाशांचा खर्च कमी होईल तसेच दररोजच्या प्रवासात वेळ आणि श्रम वाचतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा आणि हरित वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
