मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कडाक्याच्या थंडीनंतर राज्यातील किमान तापमानामध्ये आता वाढ नोंदवली जात आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. तसेच राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान देखील पाहायला मिळत आहे. राज्यात 24, 25 आणि 26 डिसेंबर रोजी तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 22 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान कसं असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असतं किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. मुंबईतील किमान तापमानामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गारठा देखील कमी झाल्याचे पाहायला मिळेल. तर पुण्यामध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. यानंतर मात्र आकाश निरभ्र होईल. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. किमान तापमानामध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 डिसेंबर रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 23 डिसेंबरपासून विदर्भात हलक्या पावसाची देखील शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.





