दीप्ती मगरच्या आत्महत्येमुळे मगर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरात दीप्ती सून म्हणून गेली तिथेच तिच्यावर गळफास घेण्याची वेळ आली. स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलीसमोर दीप्तीनं गळफास घेतला, त्या चिमुरडीची काय स्थिती झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. इंजिनिअर असलेली दीप्तीचा मगर कुटुंबानं सहा वर्षांपूर्वी रोहन चौधरीसोबत विवाह लावून दिला होता.
advertisement
50 तोळे सोनं देऊन दीप्तीचं थाटामाटात लग्न लावून देण्यात आलं होतं. मात्र चारित्र्यावर संशय घेत, दिसायला सुंदर नाहीस म्हणत छळ केला जात होता. सासरच्यांना 10 लाख रुपये कॅश आणि कारसाठी 25 लाख रुपयेही दिले होते. पैसे देऊनही छळ सुरुच होता. दीप्तीच्या मनाविरुद्ध जाऊन गर्भलिंग तपासणी केली गेली. दुसरीही मुलगी असल्याचं कळाल्यानंतर तिला गर्भपातही करायला लावला. मात्र तरीही त्रास संपत नव्हता यामुळे अखेर दीप्तीनं आत्महत्या केली. दीप्तीची सासू सरपंच तर सासरे शिक्षक आहेत. मात्र ही मंडळी घरातच संस्कार लावू शकली नाही. त्या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी दीप्तीच्या नातेवाईकांनी केलीय.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मगर कुटुंबाची भेट घेतली. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही हुंडाबळी सुरूच आहेत. अशा घटना रोखण्यासाठी तुम्ही काय केलं? असा सवाल मगर कुटुंबीयांनी उपस्थित केला. त्यावर चाकणकरांनी, आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू, असा शब्द दिला.
नेमकं काय आहे प्रकरण?
दीप्ती मगर चौधरी या विवाहितेचं नाव असून तिनं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर काही वर्ष चांगली गेल्यानंतर सासरच्या लोकांनी आपले खरे रंग दाखवले. आधीच मुलगी असल्याने सासू आणि नवऱ्याने बळजबरीने चाचणी करायला लावली. त्यावेळी तपासणीत दुसरी देखील मुलगी असल्याचं दिसून आलं. त्यावेळी सासूने जबरदस्तीने दिप्तीचा गर्भपात करून घेतला. मुलाच्या हव्यासापोटी दिप्तीवर आपल्याच बाळाच्या विरोधात जाण्यासाठी दबाव टाकला जात होता.
हुंडाबळी थांबणार तरी कधी?
उरूळीकांचन पोलिसांनी दीप्तीचा पती,दीर आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर पती रोहन चौधरी आणि सासू सुनीता चौधरीला अटक केलीय. मात्र खरा प्रश्न हा आहे की, हुंडाबळी थांबणार तरी कधी? वंशासाठी मुलगा असण्याचा हव्यास आणि संपत्तीचा लोभ यामुळे किती दीप्ती-वैष्णवी गमवायच्या आहेत? कठोर कायदे असूनही हुंडाबळी का थांबत नाहीत? याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे.
