सुरेश सपकाळ यांच्या या रक्तदान संकल्पामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळालं असून अनेकांना जीवनदान मिळालं आहे. सपकाळ यांनी रक्तदानाची सुरुवात कशी केली? त्यामागील प्रेरणा काय होती? तसेच या प्रवासात आलेले अनुभव याबाबत त्यांनी लोकल18 च्या माध्यमातून माहिती दिली आहे.
advertisement
सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ यांनी नुकतेच 101वे रक्तदान केले असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने रक्तदान करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळाले आहे. सुरेश सपकाळ यांनी सांगितले की, त्यांनी 1988 साली गरजू रुग्णासाठी पहिल्यांदा रक्तदान केले. त्यानंतर त्यांनी नियमित रक्तदान करण्याचा संकल्प केला.
आजपर्यंत सपकाळ यांनी 101 वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सपकाळ दर तीन महिन्यांनी नियमित रक्तदान करतात. रक्तदानामुळे रक्ताचे री-सर्क्युलेशन होते आणि शरीर सुदृढ राहण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. रक्तदान केल्यामुळे आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, उलट शरीर निरोगी राहते, असेही त्यांनी सांगितले.
रक्तदानाला सुरुवात कशी झाली ?
सुरेश सपकाळ यांच्या रक्तदानाची सुरुवात त्यांच्या वैयक्तिक दुःखातून झाली. त्यांचा एकुलता एक मुलगा ब्लड कॅन्सरने आजारी असताना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत होती. मात्र त्या काळात वेळेवर रक्त उपलब्ध न होणे आणि रक्तदाते मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला.
मुलाच्या निधनानंतर त्यांनी दुःखात न अडकता, इतर गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे या उद्देशाने रक्तदानाला सुरुवात केली. ते स्वतः नियमित रक्तदान करतातच, सोबतच रक्तदान शिबिरे आयोजित करून युवकांमध्ये आणि समाजात रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत.





