नियोजनाचा फज्जा: १० वाजेपर्यंत नळ कोरडेच
पुणे महानगरपालिकेने शहरातील पर्वती, वडगाव, वारजे आणि लष्कर यांसारख्या प्रमुख जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. शुक्रवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र, १० वाजून गेले तरी शहरातील कळस, विश्रांतवाडी, विमाननगर, कोथरूड आणि पेठांमधील नळ अजूनही कोरडेच आहेत. ऐन कामाच्या वेळी पाणी नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' महत्त्वाच्या भागांमधील पाणीपुरवठा 10 दिवस विस्कळीत
या विलंबाबाबत जेव्हा 'पाणीपुरवठा विभागा'शी संपर्क साधला, तेव्हा "देखभाल दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झाला," असे सांगण्यात आले. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पंपिंग यंत्रणा उशिरा सुरू झाली, परिणामी टाक्या भरण्यास वेळ लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता पाणी सकाळी १० नंतर टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.
नागरिकांची प्रचंड गैरसोय
पाणी येईल या आशेने अनेक पुणेकरांनी रात्री पाण्याचा साठा केला नव्हता. सकाळी नळाला पाणी न आल्याने सोसायट्यांमध्ये टँकरसाठी धावपळ सुरू झाली आहे. "महापालिका पाणीपट्टी वेळेत घेते, मग दुरुस्तीचे नियोजन वेळेत का होत नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
