पुणे: पुण्यातील एका उच्चशिक्षित दाम्पत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे. मुलीच्या आजारपणाचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडले. यात या दाम्पत्याने आपलं राहतं घर सुद्धा विकलं. आता काही आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी या सगळ्यात प्रश्न असा निर्माण होतो की, एखादा उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा एखाद्याच्या बोलण्यात एवढा कसा अडकतो? अशा प्रसंगी व्यक्तीची मानसिक स्थिती नेमकी कशी असते? यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कल्याणी रायदुर्ग यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. कल्याणी रायदुर्ग यांनी सांगितलं की, प्रशासनाकडून फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आणि नागरिकांना जागरूक करण्यासाठी सूचना दिल्या जातात. तरीही अनेक लोक अशा प्रकारच्या जाळ्यात अडकतात. या सगळ्यामागे भीती हा मुख्य कारणीभूत घटक असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे किंवा घडलेलंच आहे अशी भावना निर्माण होते आणि त्याचाच फायदा फसवणूक करणारे घेतात.
तसेच, जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर आजार, आर्थिक अडचण किंवा भावनिक संकटातून जात असते, तेव्हा ती कोणत्याही आशेचा आधार शोधत असते. अशा वेळी जर एखादा अनोळखी व्यक्ती तुमचं संकट दूर करू शकतो असा दावा करत मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा त्याच्यावर सहज विश्वास बसतो आणि याच विश्वासातून फसवणूक घडते.
काय काळजी घ्याल?
कोणत्याही कठीण प्रसंगी शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. तसेच कोणताही उपाय सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. अशा वेळी कुटुंबीयांशी किंवा विश्वासू मित्रांशी चर्चा करणं, तसेच प्रशासनाकडून किंवा अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करून घेणं गरजेचं आहे. शंका आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणं.या गोष्टीची दक्षता घेतली तर फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो.