काय आहे इतिहास?
त्रिशुंड गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम मंदिर असल्याचं मानलं जातं. शहाजीराजांनी इ.स. 1600 मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. 1735 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला चालना दिली. त्याचे सोमवार पेठ असं नामकरण केलं. तेव्हा या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती होती.
advertisement
दुसऱ्या बाजीरावाने बांधलाय ‘हा’ ऐतिहासिक वाडा, 200 वर्षांनंतरही आहे भक्कम, Video
कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुला नंतर, उजव्या बाजूस दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर आहे, त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार या मंदिराच्या स्वरुपात थोडा बदल झाला आहे.
या मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार, इंदूरजवळच्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू केले. 1770 पर्यंत हे काम सुरू होते. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत आणि एक फारशी शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काळ आणि रामेश्वराची (श्री शंकर) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे, तर फारशी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असल्याचं स्पष्ट केलंय.
केळकर संग्रहालयामधील मस्तानी महाल पाहिला का? पाहा कोणी केला होता उभा Video
संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुरुषभर उंचीच्या दगडी ज्योत्यावर पूर्वाभिमुख उभे आहे. राजस्थानी, माळवा आणि दक्षिणात्य वास्तुशैलीचा संमिश्र वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्यावर धारदार कमान असून अगदी वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष, लक्ष्मीमंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगलकलश, दशावतार, गजान्तलक्ष्मी अशी अनेक मांगल्य दर्शविणारी चिन्हे प्रवेशद्वारच्या भिंतीवर कोरलेली आहेत.
राजकीय घडामोडींचं शिल्प
हिंदूस्थानातील तत्कालीन राजकीय परिस्थितीतीचे चित्रण येथील एका शिल्पातून साकार होते. इंग्रजांनी प्लासीच्या युद्धानंतर 1757 मध्ये बंगाल आणि आसामवर सत्ता प्रस्थापित केली. याची दखल मोठ्या खुबीने शिल्पकराने घेतलेली दिसते. एक इंग्रज शिपाई बंगाल आणि आसामचे प्रतीक असलेल्या गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहे. लवकरच इंग्रज हिंदुस्थानात आपले पाय रोवणार याची अप्रत्यक्ष भविष्यवाणी या शिल्पातून करण्यात आलीय.
या शिव मंदिरासमोर इंग्रजांनाही व्हावे लागले होते नतमस्तक!
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती असून त्याखाली गणेशचक्र आहे. प्रदक्षिणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची मूर्ती असून उत्तरेकडील भिंतीत विष्णू आणि काळ भैरवाच्या कलात्मक रेखीव मूर्ती आहेत. दक्षिणेकडील भिंतीत मंदिराच्या मागील बाजूस आगळ्या पद्धतीचे कुठेही सहसा न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे यात फक्त शाळुंका असून त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा ठळक प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारित आहे.
तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमिस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. विश्वस्त मंडळाने येथील शिल्पांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपाय योजलेले आहेत. या अप्रतिम मंदिराची माहिती बहुसंख्य भाविकांना नाही. त्यामुळे इथं फारशी गर्दी नाही. शिल्पदृष्ट्या महत्वाचे असणारे त्रिशुंड गणेशाचे मंदिर खरोखरच अप्रतिम आहे.अशी माहिती सोमवार पेठेतील रहिवाशी प्रकाश लांडगे यांनी दिली.