पुराणांनुसार, गाईच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास आहे. म्हणून गाईला विश्वाची माता असेही संबोधले जाते. गोवत्स द्वादशी या सणाचे मूळ संस्कृतात आहे. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे वासरू. या दिवशी गाई-वासराचे पूजन केल्याने पापांचा नाश होतो, आयुष्य निरोगी राहते आणि घरात सुख-समाधान नांदते, असा विश्वास आहे. गोधनपूजनाच्या वेळी जीवो जीवस्य जीवनम् या तत्वाचा प्रत्यय येतो.
advertisement
Vastu Tips: घरात हवी सुख आणि समृद्धी, याठिकाणी ठेवा क्रिस्टल, नक्कीच होणार लाभ, Video
धार्मिक भावनांबरोबरच, गाईच्या शेण आणि गोमुत्राचे वैज्ञानिक महत्त्वही अत्यंत प्रभावी आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार, गाईच्या शेणात फिनोल, मेथानॉल, अमोनिया, फॉस्फरस, आणि नायट्रोजन यांसारखी नैसर्गिक संयुगे असतात. ही संयुगे जमिनीचे पोषण करतात, कीटकनाशक म्हणून उपयोगी पडतात तसेच रोगजंतूंचा नाश करतात.
गाईच्या गोमुत्रात सुमारे 70 पेक्षा अधिक उपयुक्त घटक आढळतात. त्यामध्ये युरिया, यूरिक अॅसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कार्बोलिक अॅसिड सारखी द्रव्ये असतात, जी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. आयुर्वेदात गोमुत्राला सर्वरोग निवारक औषध मानले गेले आहे. गोमुत्र अर्कामुळे पचन सुधारते, त्वचेवरील विकार कमी होतात आणि प्रतिकारशक्ती वाढते, असे संशोधनातही सिद्ध झाले आहे.
शुभम पंचभाई गुरुजी म्हणतात, गोधनपूजनाच्या काळात गाईसमोर प्रार्थना केल्याने ऑक्सिटोसिन आणि डोपामीन सारखी हॅपी हार्मोन्स शरीरात स्रवतात, ज्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि मन शांत राहते. तसेच गाईच्या उपस्थितीत वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे.
ग्रामीण भारतात अजूनही गाईच्या शेणाचा वापर शेतीसाठी खत, घराच्या भिंतींचे लेपन आणि इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळते. शेणातील जंतुनाशक गुणधर्मामुळे वातावरण शुद्ध राहते आणि जमिनीची सुपीकता टिकवते.
अशा प्रकारे, गाई ही केवळ धार्मिक प्रतीक नसून आर्थिक, पर्यावरणीय आणि आरोग्यदायी समृद्धीची जननी आहे. तिच्या शेण-गोमुत्राचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करणे म्हणजे शाश्वत आणि संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारणे होय. वसुबारसच्या दिवशी गोमातेचे पूजन करताना भारतीय संस्कृती आपल्याला एकच संदेश देते, निसर्गाशी सुसंवाद ठेवा, तोच खरा उत्सवाचा आनंद आहे.