कोल्हापूरच्या चमूमध्ये 12 धावपटू सहभागी झाले, त्यापैकी दोन महिला धावपटूंनीही या आव्हानात्मक शर्यतीत यश मिळवले. गेल्या अनेक महिन्यांपासून या धावपटूंनी कठोर सराव, संतुलित आहार आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत हे यश संपादन केले. ही शर्यत केवळ शारीरिक क्षमतेचीच नाही, तर मानसिक दृढतेची आणि इच्छाशक्तीची खरी कसोटी आहे. यंदाच्या मार्गात 1,200 मीटर उंचीचे चढ-उतार आणि काउईज हिल, फील्ड्स हिल, बोथाज हिल, इंचांगा, लिटिल पॉली, पॉली शॉर्ट्स यांसारख्या सात मोठ्या टेकड्यांसह अनेक छोट्या डोंगरांचा समावेश होता, ज्यामुळे ही शर्यत आणखी कठीण बनली.
advertisement
World Blood Donor Day: सर्वात दुर्मीळ रक्तगट, ज्यांना रक्त मिळणंही कठीण, तुम्हाला माहितीय का?
हवामानातील तीव्र बदल हा या शर्यतीचा आणखी एक मोठा अडथळा होता. पिटरमारिट्सबर्ग येथे सकाळी थंड हवामानात शर्यत सुरू झाली, पण डर्बनकडे जाताना तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले. अशा परिस्थितीत शरीर आणि मन थकत असतानाही कोल्हापूरच्या धावपटूंनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अंतिम रेषा गाठली.
या चमूने केवळ वैयक्तिक यशच मिळवले नाही, तर एकमेकांना प्रोत्साहन देत, उत्साह वाढवत आणि सांघिक भावनेने ही शर्यत यशस्वी केली. त्यांच्या या कामगिरीने कोल्हापूरमधील नवोदित आणि हौशी धावपटूंना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची प्रेरणा मिळाली आहे. कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात हा एक नवा टप्पा ठरला आहे. 2027 मध्ये होणाऱ्या या शर्यतीच्या शतकोत्तर पर्वात कोल्हापूरमधून अधिकाधिक स्पर्धक सहभागी व्हावेत, अशी अपेक्षा या चमूने व्यक्त केली.
या शर्यतीतील सहभागी स्पर्धक आणि त्यांनी नोंदवलेली वेळ यादीबद्ध करणे शक्य नसले, तरी त्यांच्या या यशाने कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींकडून या धावपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीने केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण भारताला गौरव प्राप्त झाला आहे.