सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, त्यानंतर लॉर्ड्सवर झालेली तिसरी टेस्ट टीम इंडियाने फक्त 22 रननी गमावली. चौथ्या टेस्टमध्ये शेवटचे दोन दिवस तब्बल 143 ओव्हर बॅटिंग करून भारताने मॅच ड्रॉ केली, यानंतर आता पाचव्या टेस्टमध्येही टीम इंडियाने विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियामधील सीरिज गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टेस्ट करिअर संपुष्टात आलं, यानंतर आता इंग्लंड सीरिजमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली, पण तरीही भारताच्या दोन खेळाडूंचं करिअर संकटात सापडलं आहे. करुण नायर आणि जसप्रीत बुमराह पुन्हा भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement
करुणकडून निराशा
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर करुण नायरचं इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये 8 वर्षांनी पुनरागमन झालं. यानंतर करुणला 5 पैकी 4 सामन्यांमध्ये संधी मिळाली, पण यातल्या फक्त एका इनिंगमध्ये करुणला अर्धशतक करता आलं. 8 टेस्ट इनिंगमध्ये करुण नायरने फक्त 205 रन केले, त्यामुळे करुण नायरसाठी ओव्हल टेस्ट ही कदाचित त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील अखेरची ठरू शकते.
बुमराहबद्दल बीसीसीआय कठोर
दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दलही बीसीसीआयने कठोर निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये बुमराह फक्त 3 टेस्ट खेळेल, हे आधीपासूनच स्पष्ट करण्यात आलं होतं, त्यानुसार बुमराह 3 टेस्ट खेळला, पण या तीनही सामन्यांमध्ये बुमराहला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. लीड्स आणि लॉर्ड्स टेस्टमध्ये बुमराहने इनिंगमध्ये 5-5 विकेट घेतल्या, पण या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. उलट बुमराह ज्या दोन टेस्ट मॅच खेळला नाही, त्यामध्येच भारताने विजय मिळवला. याशिवाय बुमराहला सीरिजमध्ये नव्या बॉलने विकेट घेण्यातही अपयश आलं.
फिटनेस आणि वर्कलोडमुळे बुमराह सीरिजच्या सगळ्या मॅच खेळू शकला नाही. आता मात्र बुमराह संपूर्ण सीरिजसाठी फिट असेल तरच त्याची निवड केली जाईल, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त आहे, त्यामुळे बुमराहचा फिटनेस आणि वर्कलोड पाहता तो टेस्टमध्ये पुन्हा खेळेल का? याबाबत शंका उपस्थित होत आहेत. तसंच भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही बुमराह इंग्लंड दौऱ्यानंतर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असं सूचक विधान केलं आहे.