नवी मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील महिला क्रिकेट विश्वचषक सामना (ICC Women’s World Cup 2025) मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी हा सामना भारतीय संघासाठी सरावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. कारण भारताला 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल खेळायचा आहे.
advertisement
मात्र हवामान विभागाने आधीच इशारा दिला आहे की त्या दिवशी पावसाची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि संघ व्यवस्थापनात मोठी चिंता निर्माण झाली आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. जर भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल पावसामुळे रद्द झाला, तर मग निकाल काय लागणार?
रिझर्व्ह डेची व्यवस्था आहे का?
महिला विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ICC नॉकआउट सामन्यांसाठी रिझर्व्ह डे (Reserve Day) ठेवते. या स्पर्धेतही आयसीसीने सेमीफायनल आणि फायनल दोन्हीसाठी रिझर्व्ह डेची व्यवस्था केली आहे. म्हणूनच जर भारत-ऑस्ट्रेलिया सामना 30 ऑक्टोबरला पावसामुळे खेळवता आला नाही, तर हा सामना पुढील दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरला होईल. जेणेकरून मॅचचा निकाल निघावा आणि कोणता संघ फायनलमध्ये जाणार हे स्पष्ट व्हावे.
दोन्ही दिवशी पाऊस झाला तर काय?
जर पावसामुळे मुख्य दिवशी आणि रिझर्व्ह डे या दोन्ही दिवशी सामना पूर्णपणे रद्द झाला, तर काय होईल? याचे उत्तरही आयसीसीच्या नियमांमध्ये स्पष्टपणे दिलेले आहे. जर सामना दोन्ही दिवशीही खेळवता आला नाही, तर लीग टप्प्यात ज्या संघाने उत्तम कामगिरी केली असेल, त्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश दिला जाईल.
ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये?
सध्याच्या लीग फेरीकडे पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनपर्यंत अजिंक्य राहिला आहे. त्यांनी त्यांच्या सर्व सहा सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरीकडे भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी फक्त तीन सामने जिंकले होते.
त्यामुळे लीग फेरीतील एकूण कामगिरीच्या आधारे ऑस्ट्रेलियाचा संघ पुढे आहे. त्यामुळे जर सेमीफायनल आणि रिझर्व्ह डे दोन्ही दिवशी पावसामुळे सामना खेळवता आला नाही, तर ऑस्ट्रेलिया थेट फायनलमध्ये पोहोचेल आणि भारताला संधी गमवावी लागेल.
या परिस्थितीमुळे देशभरात लाखो चाहत्यांची नजर आता हवामानावर लागली आहे. जर पावसाने पुन्हा अडथळा आणला, तर भारतीय महिला संघाचा विश्वविजेतेपदाचा मार्ग न खेळताच संपुष्टात येऊ शकतो.
