'टेस्ट क्रिकेट हे असं आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागते, कारण बराच वेळ तुम्हाला मैदानात राहावं लागतं. तुम्हाला पाच दिवस खेळावं लागतं. मानसिकदृष्ट्या हे खूप आव्हानात्मक आणि थकवणारं आहे. प्रत्येक खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून मोठा होतो, जेव्हा आम्ही प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळायला सुरूवात करतो, तेव्हा मॅच दोन किंवा तीन दिवसांमध्ये संपतात. लहान वयापासूनच तुम्हाला यासाठी तयार व्हावं लागतं, यामुळे परिस्थितीचा सामना करणं सोपं होतं', असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
advertisement
'तुम्ही जेव्हा सगळ्यात मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळता तेव्हा तुम्हाला बरंच काही करावं लागतं. एकाग्रता सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही जेव्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या ताजेतवाने असणे गरजेचं आहे', असं रोहित शर्मा म्हणाला. टेस्ट क्रिकेट मानसिकदृष्ट्या आणि शारिरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचं रोहितने सांगितलं, याच कारणामुळे रोहितने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रोहितचं टेस्ट करिअर
रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमध्ये 67 मॅच खेळल्या, यात त्याने 40.57 च्या सरासरीने 4,301 रन केले, ज्यात 18 अर्धशतकं आणि 12 शतकांचा समावेश होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाचा भारतामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 3-0 ने पराभव झाला, यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताला पराभव पत्करावा लागला, तेव्हापासून रोहितच्या टेस्ट क्रिकेटमधल्या कॅप्टन्सीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. इंग्लंड दौऱ्याच्या आधी रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.