विराट आणि एबी डिव्हिलियर्स आपल्यासोबत नेमकं काय बोलले? याबद्दल मनिष आणि खेमराज यांनी सांगितलं आहे. मनिष आणि खेमराज हे छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील मडगावमध्ये राहतात. 28 जून ला या दोघांनी एक नवीन सिम कार्ड विकत घेतलं. हे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकताच त्यांना फोन यायला सुरूवात झाली. फोनवर बोलत असलेला समोरचा व्यक्ती आपण विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स असल्याचं सांगायचा, पण या दोघांनाही आपल्यासोबत कुणीतरी मस्करी करत असल्याचं वाटत होतं. अखेर एक दिवस रजत पाटीदारने दोघांना फोन केला आणि मग प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
advertisement
विराट फोनवर काय बोलला?
एबी डिव्हिलियर्सचा आवाज ऐकून मी खूश झालो होतो, पण तो इंग्रजीमध्ये बोलत होता, त्यामुळे मला काही समजलं नाही, असं खेमराज पीटीआयसोबत बोलताना म्हणाला आहे.
'गावामध्ये राहून एक दिवस मला विराट कोहलीसोबत बोलता येईल, याचा विचारही मी केला नव्हता. जेव्हा एबी डिव्हिलियर्सचा फोन आला तेव्हा तो इंग्रजीमध्ये बोलायला लागला, यातला एकही शब्द मला समजला नाही. पण आम्ही खूपच खूश होतो. जेव्हा मनिषला कॉल यायचा तेव्हा तो मला फोन द्यायचा. विराट आणि यश दयाळने आम्हाला विचारलं, तुम्ही रजत पाटीदारचा नंबर का वापरत आहात? आम्ही सांगितलं, की आम्ही हे सिम कार्ड विकत घेतलं आहे आणि हा नंबर आमचा आहे', अशी प्रतिक्रिया हेमराजने दिली आहे.
गरियाबंद पोलीस उपाधिक्षक नेहा सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू मनिषला फोन करत होते, जे रजत पाटीदारच्या संपर्कात होते. पाटीदारने मध्य प्रदेश सायबर सेलला तक्रार केली, की त्याचा फोन नंबर दुसऱ्या कुणालातरी दिला गेला आहे. हा नंबर आपल्याला परत मिळावा, अशी विनंतीही रजत पाटीदारने मध्य प्रदेश सायबर सेलकडे केली.
रजत पाटीदारच्या तक्रारीनंतर मनिष आणि खेमराज यांच्या घरी पोलीस आले. पोलीस घरी आल्यानंतर दोघांनीही त्यांच्या मर्जीने सिम कार्ड परत केलं. विराट कोहलीसोबत आम्ही बोललो, ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहिल. आम्ही विराटशी बोललो हे आम्ही आयुष्यभर अभिमानाने सगळ्यांना सांगू, असं मनिष आणि खेमराज म्हणाले.