भंडाऱ्याचा सडा, साहसी खेळांचं प्रदर्शन अन् सदानंदाचा जयघोष... अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला तेव्हापासून दरवर्षी जेजुरी नगरीत मोठी यात्रा भरते. विशेषत: या यात्रेस बहुजन बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने येतात. भाविकांकडून कुलधर्म कुलाचार करत येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट असा जयजयकार केला जात आहे.