रविवारपासून सुरू होतोय भाकडमास, धर्मशास्त्रानुसार काय करावे आणि काय करु नये?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होते. यावर्षी रविवार, 21 डिसेंबर 2025 पासून पौष महिना सुरू होत आहे. मराठी संस्कृतीत या महिन्याला 'भाकडमास' असे म्हटले जाते.
Mumbai : हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होते. यावर्षी रविवार, 21 डिसेंबर 2025 पासून पौष महिना सुरू होत आहे. मराठी संस्कृतीत या महिन्याला 'भाकडमास' असे म्हटले जाते. या महिन्याला जरी 'भाकड' म्हटले जात असले, तरी आध्यात्मिक दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धर्मशास्त्रानुसार, या काळात सूर्याचे संक्रमण धनु राशीत होत असल्याने याला 'धनुर्मास' किंवा 'खरमास' असेही म्हणतात. या काळात कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाकडमास म्हणजे काय?
'भाकड' या शब्दाचा अर्थ ज्यापासून काही विशेष फळ मिळत नाही असा होतो. पौष महिन्यात मकर संक्रांतीचा अपवाद वगळता इतर कोणतेही मोठे सण येत नाहीत. तसेच या महिन्यात विवाहासारखे शुभ मुहूर्त नसल्यामुळे याला 'भाकडमास' असे संबोधले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यातील पुष्य नक्षत्राचा स्वामी गुरु आहे, जो विरक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे. त्यामुळे या काळात भौतिक प्रगतीपेक्षा आध्यात्मिक प्रगतीकडे जास्त लक्ष दिले जाते.
advertisement
काय करावे आणि काय टाळावे?
शुभ कार्ये वर्ज्य करावीत: भाकडमास किंवा खरमास सुरू असताना विवाह, मुंज, साखरपुडा, गृहप्रवेश आणि नवीन वास्तूचे बांधकाम करणे टाळावे. असे मानले जाते की, या काळात केलेल्या शुभ कार्यांना सूर्याची पूर्ण ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे त्या कार्यांत अडथळे येऊ शकतात.
सूर्योपासना आणि अर्घ्यदान: पौष महिना हा सूर्याचा महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे. यामुळे आत्मबळ वाढते आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. 'ओम सूर्याय नमः' या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरते.
advertisement
दानधर्माला महत्त्व: या महिन्यात केलेल्या दानाचे फळ अनेक पटींनी जास्त मिळते. विशेषतः गरिबांना तिळ, गूळ, ब्लँकेट, गरम कपडे आणि अन्नदान करावे. या महिन्यात पितरांच्या नावाने केलेले दान त्यांना अक्षय तृप्ती देते.
सात्त्विक आहार आणि व्यसनमुक्ती: धर्मशास्त्रानुसार या महिन्यात तामसिक आहार (मांस, मदिरा, कांदा, लसूण) टाळावा. भाकरी आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. विशेषतः संक्रांतीच्या काळात बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याला महत्त्व आहे, जे आरोग्यासाठी पूरक असते.
advertisement
तीर्थस्नान आणि विरक्ती: पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. जर नदीवर जाणे शक्य नसेल, तर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाकून स्नान करावे. यामुळे मागील जन्मातील पापांचे क्षालन होते, अशी श्रद्धा आहे.
अध्यात्म आणि ग्रंथवाचन: या काळात नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक सुरू करण्यापेक्षा भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम किंवा भागवत पुराणाचे वाचन करावे. मनाची शांती मिळवण्यासाठी आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी हा महिना ध्यानासाठी अत्यंत शुभ आहे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
रविवारपासून सुरू होतोय भाकडमास, धर्मशास्त्रानुसार काय करावे आणि काय करु नये?










