PUC शिवाय वाहन चालवणार? इतका बसू शकतो दंड, नवीन नियम काय? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर लागू होणार असून विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन करण्यात आलीय.
छत्रपती संभाजीनगर : पीयूसीसाठी लवकरच नवीन दर लागू होणार असून विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीत तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम व तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करणार असून महाराष्ट्रासाठी देखील नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील, पीयूसी म्हणजे काय? पीयूसी नसेल तर दंड किती लागणार, तसेच वाहनधारकांना पीयूसी प्रमाणपत्र किती दिवसांनी बदलावे लागणार, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
पीयूसी म्हणजे काय?
पीयूसी म्हणजे Pollution Under Control Certificate - म्हणजेच वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र भारतात प्रत्येक वाहनासाठी अनिवार्य आहे. वाहनाच्या इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या धुरातील प्रदूषणाचे प्रमाण मोजणारे व त्यावर आधारित देण्यात येणारे प्रमाणपत्र आहे. वाहनाचे धूर उत्सर्जन कायद्याने ठरवलेल्या मर्यादेत आहे की नाही, हे याच्या तपासणीत समजते. हे प्रमाणपत्र मोटार वाहन अधिनियम, 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत अनिवार्य आहे.
advertisement
तुमच्याकडे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर दंड किती लागणार?
दुचाकी वाहनांसाठी 50 ते 100 रुपयांत पीयूसी प्रमाणपत्र घेता येते. तीन चाकी वाहनांसाठी 100 ते 150 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 150 ते 200 रुपयांत पीयूसी प्रमाणपत्र घेता येते. जर वाहनधारकाकडे पीयूसी नसेल तर 2 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. याबरोबरच चारचाकी वाहनासाठी 4 हजार रुपयांचा दंड आकारला जातो. हा दंड वाहतूक पोलीस किंवा आरटीओकडून बसतो.
advertisement
पीयूसी प्रमाणपत्र किती दिवसांनी बदलावे लागते?
वाहन नवीन असेल, तर कंपनीमार्फत एक वर्षासाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर, त्याची मुदत संपल्यानंतर वाहनधारकांना दर सहा महिन्यांनी पीयूसी चाचणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 40 ठिकाणी पीयूसी तपासणी केंद्र आहे. जालना रोडसह बीड बायपासहून, शेंद्रा, वाळूज महानगर परिसरात पेट्रोल पंपांजवळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी 40 पीयूसी सेंटर आहेत.
advertisement
धूर सोडणाऱ्या वाहनांना देखील पीयूसी सहज मिळू शकते.
सहसा चारचाकीधारक नियमितपणे पीयूसी काढतात. परंतु पीयूसीशिवाय धावणाऱ्या दुचाकींची संख्या अधिक आहे. त्यात धूर सोडणाऱ्या वाहनांनादेखील सहजपणे पीयूसी मिळत आहे, त्यामुळे अद्याप पीयूसी काढली नसलेल्या सर्व वाहनधारकांनी पीयूसी काढून घ्यावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 13, 2025 9:05 PM IST