भांडी व्यावसायिकाची मुलगी ते IAS अधिकारी, नमामी बंसल यांचा प्रेरणादायी प्रवास
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
तीन वर्षं अपयशाचा सामना केल्यानंतर अखेर नमामिने 17 व्या क्रमांकाने यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं.
यूपीएससीसारख्या परीक्षांचे निकाल लागतात तेव्हा जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या कहाण्या समोर येतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यशस्वी होणारे कितीतरी उमेदवार आपल्या प्रवासातून अनेकांना प्रेरणा देत असतात. अशीच एक उमेदवार म्हणजे उत्तराखंडमधील नमामि बन्सल. गरीब कुटुंबातून आलेल्या नमामिने आपला भार कुटुंबावर टाकायचा नाही म्हणून यूपीएससीची वाट चोखाळली आणि ती आयएएस झाली.
एखादी गोष्ट मिळवायची जिद्द तुमच्याकडे असेल तर कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्यावर मात करत तुम्ही यशस्वी होता. नमामि बन्सल हिच्या उदाहरणातून त्याचाच प्रत्यय येतो. नमामि ही योगनगरी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या हृषीकेशची रहिवासी आहे. तिच्या वडिलांचा भांड्यांचा व्यवसाय होता. त्यामुळे नमामिच्या अभ्यासाचा खर्च करणं त्यांना शक्य नव्हतं. मात्र, आपण आपला भार कुटुंबावर टाकायचा नाही असा निश्चय करून नमामिने आपला मार्ग निवडला आणि ती यशस्वीही झाली.
advertisement
नमामिच्या वडिलांचं हृषीकेशमध्ये भांड्यांचं दुकान आहे. त्या दुकानातून जेमतेम कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढीच कमाई होत असे. नमामि सुरुवातीपासूनच हुशार होती. 10 वीच्या परीक्षेत 92 टक्के आणि 12 वीच्या परीक्षेत तिने 95 टक्के मार्क मिळवले. त्यानंतर तिने दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे तिने अर्थशास्त्रातील शिक्षण पूर्ण केलं.
ग्रॅज्युएट होताच तिने नोकरी करायला सुरुवात केली. नोकरी करतानाच तिने यूपीएससीची तयारीही सुरु केली. कोचिंग क्लासला न जाता अभ्यास करायचा निर्णय तिने घेतला. स्वतः नोट्स काढत तिने अभ्यास सुरु केला आणि परीक्षेच्या तयारीला लागली. पहिल्या प्रयत्नात तिला यश आलं नाही. त्यामुळे ती निराश झाली; मात्र तिने तयारी सोडली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नातही यश न आल्यामुळे ती उदास होत होती; पण नव्या जोमाने तयारी करत होती. तीन वर्षं अपयशाचा सामना केल्यानंतर अखेर नमामिने 17 व्या क्रमांकाने यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं.
advertisement
2017 मध्ये तिने हे यश मिळवलं. साहजिकच तिला आयएस अधिकारी होण्याची संधी मिळाली. सध्या ती उत्तराखंड राज्यात प्रशासकीय सेवा करत आहे. तिचं नाव ‘नमामि’ असल्यामुळे यूपीएससी परीक्षेच्या शेवटच्या मुलाखतीच्या फेरीत तिला ‘नमामि गंगे’ या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आल्याची आठवण ती अजूनही सांगते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 18, 2024 11:37 AM IST










