गणिताची शिक्षिका झाली शेतकरी! सेंद्रीय शेतीतून मिळवलं कोट्यवधींचं उत्पन्न
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या प्रतिभा यांनी शेती व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमवले आहेत. एवढंच नाही तर सुमारे 1400 शेतकर्यांना सेंद्रिय शेतीद्वारे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत केली आहे.
भोपाळ : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही आपल्या देशाच्या अर्धव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं सर्वात जास्त योगदान आहे. असं असूनही शेती करणाऱ्या व्यक्तीला फारसा आदर मिळत नाही. आदर मिळत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर समजलं जात नाही, असं म्हटल तरी चुकीचं ठरणार नाही. मात्र, मध्य प्रदेशातील भोपाळमधील प्रतिभा तिवारी यांनी हा समज खोटा ठरवला आहे. गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या प्रतिभा यांनी शेती व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमवले आहेत. एवढंच नाही तर सुमारे 1400 शेतकर्यांना सेंद्रिय शेतीद्वारे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत केली आहे.
लग्नानंतर प्रतिभा आपल्या पतीसोबत भोपाळमध्ये स्थायिक झाल्या. दोघेही तिथे नोकरी करत होते. पतीच्या कुटुंबाकडे भोपाळपासून 150 किमी अंतरावर असलेल्या हरदा गावात 50 एकर जमीन होती. प्रतिभा जेव्हा हरद्याला जायच्या तेव्हा बहुतेक शेतकरी रसायनांचा वापर करून पीक घेताना दिसायचे. मात्र, जमिनीच्या एखाद्या छोट्या तुकड्यात ते सेंद्रिय शेती करायचे. उत्सुकतेपोटी प्रतिभा यांनी शेतकर्यांना या सेंद्रिय शेतीबद्दल विचारलं. शेतकरी घरगुती गरजांसाठी ही छोटी सेंद्रिय शेती करत होते आणि बाजारात विक्रीसाठी रसायनांचा वापर केलेली पिकं जातं होती. हे समजल्यानंतर प्रतिभा अस्वस्थ झाल्या.
advertisement
2016 मध्ये स्वत: सुरू केली शेती
राज्य सरकारच्या कृषी विभागानं आयोजित केलेल्या सेंद्रिय शेतीवरील कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये प्रतिभा सहभागी होऊ लागल्या. त्यांनी दिल्लीत सेंद्रिय शेतीच्या अभ्यासक्रमासाठी देखील प्रवेश घेतला. आपले पती आणि कुटुंबाला सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केलं. ते सर्व संकोचत होते त्यामुळे प्रतिभा यांनी सुरुवातीला त्यांना छोट्या क्षेत्रात सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला दिला. 2016 मध्ये त्यांनी थोड्याशा जमिनीवर गहू पिकवायला सुरुवात केली. पारंपारिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळायला तीन ते पाच वर्षे लागतात. कारण जमीन पूर्णपणे विषारी रसायनांपासून मुक्त होणं गरजेचं असतं. सेंद्रिय पदार्थांचा वापर करून जमिनीची सुपीकता पुनरुज्जीवित झाली पाहिजे आणि सुधारली पाहिजे.
advertisement
सुरुवातीला मिळालं अपयश
सुरुवातीला, प्रतिभा ज्या जमिनीवर सेंद्रिय शेती करत होत्या, त्या जमिनीवरील गव्हाचं उत्पादन 18 क्विंटल प्रति एकरवरून सुमारे 10 क्विंटल प्रतिएकर इतकं कमी झालं. जमिनीच्या काही भागावर मूग पिकवण्याचाही प्रयत्न केला. पण, किडीमुळे संपूर्ण पीक नष्ट झालं. पण, या अपयशामुळे त्यांनी धीर सोडला नाही. सेंद्रिय उत्पादनाकडे वाटचाल करत प्रतिभा यांनी स्वतःचा सेंद्रिय उत्पादन ब्रँड 'भूमिषा' लाँच केला. त्यांनी 2016 मध्ये भोपाळमध्ये 'भूमिषा ऑरगॅनिक्स' स्टोअर सुरू केलं. जिथे गहू, तांदूळ, डाळी, मसाले, लोणचे, औषधी वनस्पती, मैदा, क्विनोआ सारख्या खाद्य बिया आणि कोल्ड प्रेस्ड तेलांसह 70 प्रकारचे सेंद्रिय खाद्य पदार्थ विकले जातात. भोपाळ, दिल्ली आणि मुंबईत शहरात त्यांचे जवळपास 400 ग्राहक आहेत.
advertisement
2019 पर्यंत प्रतिभा यांनी आपली संपूर्ण जमीन सेंद्रिय बनवली. त्यासाठी त्यांना शासनाकडून प्रमाणपत्रही मिळालं. त्या आपल्या शेतीत गहू, कुळीथ, हरभरा आणि वाटाणा पिकवतात. त्यांनी रोसेला, मोरिंगा, हिबिस्कस आणि कोरफड यांसारख्या औषधी वनस्पतींचीही लागवड केली आहे. जशी शेतातील माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध होत गेली, तसतसं उत्पादन हळूहळू वाढू लागलं. सेंद्रिय शेती अंतर्गत पीक उत्पादन पारंपारिक शेतीच्या बरोबरीचं झाले. आज त्यांची शेती आणि शेतीशी संबंधित कामांमधून 1 कोटींहून अधिक रुपयांची वार्षिक उलाढाल आहे.
Location :
Bhopal,Madhya Pradesh
First Published :
September 09, 2023 1:20 AM IST