UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना मिळणार एक लाख रुपये; कसा घ्याल या योजनेचा लाभ?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
यूपीएससी प्रिलिम परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल, अशी घोषणा तिथल्या सरकारने केली आहे.
यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आता यूपीएससी पूर्वपरीक्षा (प्रिलिम) उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल, अशी घोषणा तिथल्या सरकारने केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी नुकतीच राज्यात 'राजीव गांधी नागरी अभयहस्तम' नावाची योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांनी यूपीएससी प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ते यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे हा, या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अशा उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ही आर्थिक मदत 'निर्माण कार्यक्रमा'चा भाग असेल.
advertisement
कोणाला मिळेल लाभ?
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. तेलंगण सरकारच्या राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजनेचा लाभ राज्यातील मूळ रहिवाशांनाच मिळू शकेल. यासाठी उमेदवार हा राज्यातला स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक आहे. तेलंगणमधल्या सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी उमेदवाराने यूपीएससी प्रिलिम उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याचं कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावं. केंद्र किंवा राज्य सरकारमधल्या कोणत्याही स्थायी पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय कोणत्याही उमेदवाराला नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होताना एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
advertisement
यूपीएससीकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) ही केवळ देशातलीच नव्हे तर जगभरातल्या सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यासाठी उमेदवारांना अनेक वर्षं अभ्यास करावा लागतो. आपल्या देशात दर वर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. त्यापैकी मोजक्याच लोकांना यश मिळतं. उर्वरित उमेदवार पुढच्या वर्षासाठी पुन्हा तयारी करतात. प्रिलिममध्ये यश मिळालेले उमेदवार मुख्य परीक्षेची तयारी करतात. त्यांना अर्थसाह्य देण्यासाठी तेलंगण सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 24, 2024 11:37 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना मिळणार एक लाख रुपये; कसा घ्याल या योजनेचा लाभ?










