मोबाईल पाण्यात फेकला, 13 वर्षीय मुलाने थेट गेमच केला, महिलेचा मृत्यू!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna Crime: मोबाईल फोन पाण्यात फेकण्याच्या वादातून 13 वर्षीय मुलाने थेट महिलेचा खून केला आहे. जालन्यातील या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
जालना: मोबाईल पाण्यात फेकला आणि शेतात जाणारे पाणी अडवल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने 41 वर्षीय महिलेचा खूनच केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी येथील घटनेने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे असे होते. या प्रकरणी अंकुश सदाशिव औटे यांनी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. एलसीबी पथक आणि तीर्थपुरी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
नेमकं घडलं काय?
25 मार्च रोजी शेतात पाटाचे पाणी आणि मोबाईल पाण्यात फेकल्यावरून 13 वर्षीय मुलाचा महिलेशी वाद झाला होता. या रागातून मुलाने 41 वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारले. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खुनाचा छडा लावला. पोलीस तपासानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
advertisement
असा झाला उलगडा
या घटनेनंतर गावातील काही लोकांनी एका मुलाला शेतातून पळताना पाहिले होते. त्यांनी पोलिसांना या मुलाचे वर्णन दिले, ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत झाली. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि तीर्थपुरी पोलिसांनी एकूण 7 संशयितांची चौकशी केली. अखेरीस शेजारील शेतातून पळणाऱ्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली. या तपासात पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी विशाल खांबे यांच्यासह एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे साजिद अहमद आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 9:50 AM IST









