भारतीय सिनेमाची जगभरात क्रेझ, केंद्रीय सचिव संजय जाजूंची चित्रपट महोत्सवाला भेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Film Festival 2025: भारतीय सिनेमांना जगभरात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी केलंय. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास त्यांनी भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या 10 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झालीये. चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी भेट दिली. यावेळी आज आपले सिनेमे जगभर जात असून जगभरातील प्रेक्षक त्यांना आनंदाने पाहात उत्तम प्रतिसाद देत असल्याचे प्रतिपादन जाजू यांनी केले.
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाला कायम प्रोत्साहन दिलेले असून सिनेमा हा ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना भारत सरकार सहकार्य करत आहे. आपले वेगळेपण जपणाऱ्या या महोत्सवाला भविष्यात केंद्र सरकारच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन जाजू यांनी दिले.
advertisement
यावेळी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, संयोजक नीलेश राऊत, प्रा. शिव कदम उपस्थित होते.
संभाजीनगरकरांचे कौतुक
“आपल्या देशाला एक महान सांस्कृतिक परंपरा आहे. नाट्य शास्त्रापासून कला, नाट्य, नृत्य आणि संगीत यांचा वारसा लाभलेला आहे. याच शृंखलेतील सिनेमा हे आधुनिक माध्यम आहे. गोव्यानंतर येथे असलेली विविधता आणि चित्रपटाची संस्कृती पुढे नेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. येथील लोकांनी एकत्रित येत स्वत: हा महोत्सव सुरू केला, याचे कौतुक वाटते. आज मला या महोत्सवात सहभागी होत असताना मनापासून आनंद होत आहे. विशेषत: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मास्टर क्लास ऐकण्याची संधी मला मिळाली, असे जाजू यांनी यावेळी सांगितले.
advertisement
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रसिध्द लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याता आला.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
January 17, 2025 2:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भारतीय सिनेमाची जगभरात क्रेझ, केंद्रीय सचिव संजय जाजूंची चित्रपट महोत्सवाला भेट


