पुढचे 7 दिवस धोक्याचे! मुंबई-रायगडमध्ये रेड अलर्ट, तर 5 जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. हवामान विभागाने पुढील सात दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
मुंबई, उपनगर, ठाणे, उपनगर, नवी मुंबईत शुक्रवारी संध्याकपासून पावसाने जोर धरला आहे. तेव्हापासून सलग पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. मध्यरात्रीपासून पाऊस अक्षरश: कोसळत आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी पुढचे सात दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबईला मुसळधार पावसानं झोडपल्यानं अनेक भागात पाणी साचलं आहे. लोकलची वाहतूकही धीम्या गतीनं सुरू आहे.
हवामान विभागाने मुंबईत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. शनिवार आणि रविवार मुसळधारेचा इशारा देण्यात आला असून या दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 5 जिल्ह्यांमध्ये देखील धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढचे सात दिवस अति मुसळधार पाऊस राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पुढील ३ तासात पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. असं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलं तर अनेक घरांमध्ये पाणी, जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
पुढचे सात दिवस मुंबईसह आसपासचे जिल्हे, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अति मुसळधार पाऊस राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस राहील असा इशारा देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या तिन्ही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2025 7:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुढचे 7 दिवस धोक्याचे! मुंबई-रायगडमध्ये रेड अलर्ट, तर 5 जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा इशारा