समजूतदारपणा दाखवायला हिंमत लागते! ईश्वर चिठ्ठीतून MIM च्या उमेदवाराने घेतली माघार, सगळे करताय कौतुक
- Reported by:KUNDAN JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
अकोल्यात ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून दोन उमेदवारांपैकी एकाने निवडणुकीतून माघार घेण्याची ही पहिलीच घटना असल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.
अकोला : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अर्ज मागे घेतल्यामुळे आता मैदानात कोण कोण आहे, याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. पण, तिकीट मिळवण्यासाठी राज्याभरात इच्छुक उमेदवारांची रडारड, बेशुद्ध पडणे, उपोषणाला बसण्याचे प्रकार अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. एवढंच नाहीतर काही ठिकाणी तर आपल्याच नेत्याची कार अडवून काळा स्प्रे मारला होता. पण, लोकशाहीमध्ये समजूतदार पणा काय असतो, हे अकोल्यात पाहण्यास मिळालं. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक उमेदवारांनी विविध कारणांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र एमआयएमच्या एका उमेदवाराने अतिशय वेगळ्या आणि चर्चेत राहणाऱ्या कारणामुळे आपला नामांकन अर्ज मागे घेतल्याची घटना समोर आली आहे.
अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एमआयएमकडून समीम बी रफिक कुरेशी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमरील ददफ सैय्यद नाजीम हे उमेदवार उभे होते. या दोन्ही उमेदवारांची ताकद आणि राजकीय स्थिती जवळपास समान असल्यानं थेट लढत पाहायला मिळणार होती. मात्र, नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ईश्वर चिठ्ठी काढून उमेदवार ठरवण्यात आला आणि त्यानुसार एमआयएमच्या उमेदवार समीम बी रफिक कुरेशी यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि निवडणुकीत समजूतदारपणाचं आदर्श उदाहरण घालून दिलं.
advertisement
ईश्वर चिठ्ठी मान्य
अकोल्यात ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून दोन उमेदवारांपैकी एकाने निवडणुकीतून माघार घेण्याची ही पहिलीच घटना असल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणूक समीकरण त्या वेळी स्पष्ट झाले, जेव्हा मुस्लिम समाजात एकता कायम राखण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. सुरुवातीला या प्रभागात तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत मुस्लिम पॅनल तयार करण्यात आले होते. त्यानंतर दोन जणांनी महिला आरक्षणाअंतर्गत एमआयएमकडून उमेदवारी मिळवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि एमआयएम आमने-सामने आले.
advertisement
मतांचं विभाजन होईल
या परिस्थितीत मुस्लिम समाजातील वरिष्ठ नागरिकांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांना समजावलंं की मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा इतर उमेदवाराला होऊ शकतो. समाजहित आणि एकजुटीच्या दृष्टीने आपसी सहमती निर्माण करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवाराचे नाव निघाले.
advertisement
...आणि MIM च्या उमेदवाराची माघार
चिठ्ठीचा निर्णय समाजहितासाठी सर्वांनी मान्य केला आणि त्यानंतर एमआयएमच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. या निर्णयानंतर आता प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांचा उमेदवारच निवडणूक रिंगणात राहणार आहे. हा निर्णय समाजात एकजूट, सलोखा आणि सामूहिक हिताला प्राधान्य देणारा पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 7:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
समजूतदारपणा दाखवायला हिंमत लागते! ईश्वर चिठ्ठीतून MIM च्या उमेदवाराने घेतली माघार, सगळे करताय कौतुक








