ज्या तमाशाला राष्ट्रपतींनी नावाजलं, त्या कलाकारांवरच गावगुंडांचा हल्ला, पोरींवर हात टाकला, दोन लाखही घेऊन गेले!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलावंतांवर काही टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला केला. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार परिसरातील पेट्रोल पंपाजवळ गाडीला कट मारल्याच्या कारणावरून काही टवाळखोरांनी कलावंतांना बेदम मारहाण केली.
मुंबई : महाराष्ट्राला तमाशा परंपरेचा मोठा वारसा आहे. तमाशा कलेतून लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधनही केले जाते. गावगाड्यातील कलाकार मंडळी याच कलेच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवतात. यात्रा जत्रांच्या निमित्ताने अनेक गावात जाऊन कलाकार मंडळी आपली कला सादर करून वर्षभराची भाकरी गोळा करतात. मात्र कलाकारांचा हा संघर्षही आता काहींच्या डोळ्यात खुपू लागला आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलावंतांवर काही टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला केला. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार परिसरातील पेट्रोल पंपाजवळ गाडीला कट मारल्याच्या कारणावरून काही टवाळखोरांनी कलावंतांना बेदम मारहाण केली. तसेच गावगुंडांनी महिला कलावंतांची छेडछाडही काढल्याचे आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तमाशा कलाकारांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत अनेक कलाकार जखमी झाले असून महिलांनाही शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा आरोप आहे. सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम बांगर, सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ असे आरोपींची नावे आहेत. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार गावचे हे आरोपी राहणारे आहेत.
advertisement
घटना नेमकी काय आणि कुठे घडली?
फिर्यादी कैलास सावंत म्हणाले, "आमचा तमाशा सारोळे पठार ता. संगमनेर येथे जात होता. कार्यक्रमासाठी जात असताना वरुडी पठार शिवारातील एच.पी. पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी गेलो होतो. तेथे डिझेल भरुन पेट्रोल पंपाच्या बाहेर येत असताना आमच्या ट्रकच्या समोर चार ते पाच मोटारसायकलवर अनोळखी इसमांनी ट्रक ड्रायव्हर प्रकाश विठठल औटी याला कट मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करुन ड्रायव्हरला गाडीतून खाली ओढून मारहाण करायला सुरुवात केली".
advertisement
"त्यानंतर मी आणि आमचे तमाशातील कलावंत भांडण सोडवण्यासाठी गेलो असता आम्हालाही बेदम मारहाण केली. तसेच ट्रकच्या काचेवर दगड मारुन काचा फोडून गाडीचे नुकसान केले. तसेच आमच्या बसमधील महिला कलावंतांना शिवीगाळ त्यांच्या अंगावत हात टाकला. काहींनी तर महिला कलावंतांच्या अंगावरील कपडे फाडले. आरोपींची संख्या बघून आम्ही घाबरून गेलो होतो. महिला कलावंत भेदरल्या होत्या" असे कैलास सावंत यांनी सांगितले.
advertisement
अभिनेते अभिनेत्रींना सुरक्षा मिळते, तमाशा कलावंतांवर मात्र हल्ले होतात
या सगळ्या घटनेच्या संदर्भाने तमाशा कलावंत मोहित नारायणगावकर यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी घटनेच्या अनुषंगाने उद्विग्न भावना व्यक्त केल्या. "तमाशा ही महाराष्ट्राची ओळख, आपल्या मातीचा अभिमान. पण या कलेच्या मागे उभे असलेले कलावंत मात्र आजही असुरक्षित-उपेक्षित आणि संघर्षमय जीवन जगत आहेत हे कटू सत्य आहे. गावोगावी यात्रा सुरू आहेत. हेच ते दिवस, जेव्हा तमाशा फड मालक आणि कलाकार सकाळ-संध्याकाळ कार्यक्रम करून आपल्या कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीची सोय करतात. पण या प्रवासात त्यांना सन्मान नाही, तर भीती आणि अपमानच जास्त मिळतो. काल काही गावगुंडांनी आमच्या कलावंतांवर हल्ला केला. महिला भगिनींवर हात टाकला. आपल्याकडे अभिनेते अभिनेत्रींना सुरक्षा मिळते. त्यांना मानसन्मान मिळतो, पण आमच्या वाट्याला कायम उपेक्षा येते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की कलाकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना सोडू नका. कलाकारांना राजाश्रय नको, केवळ आमच्या संघर्षात साथ असू द्यात" असे उद्विग्नपणे मोहित नारायणगावकर म्हणाले.
advertisement

मोहित नारायणगांवकर
विठाबाई नारायणगावकर यांनी सीमेवर जाऊन जवानांचं मनोरंजन केलं होतं
विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळाला मोठा वारसा आहे. तमाशा परंपरेतील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव असून तमाशातील अमुल्य योगदानासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने नावाजले गेले. १९६२ च्या भारत चीन युद्धावेळी थेट सीमेवर जाऊन विठाबाई नारायणगावकर यांनी भारतीय जवानांचे मनोरंजन केले होते. त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाने २००६ मध्ये 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 7:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या तमाशाला राष्ट्रपतींनी नावाजलं, त्या कलाकारांवरच गावगुंडांचा हल्ला, पोरींवर हात टाकला, दोन लाखही घेऊन गेले!










