छ. संभाजीनगरमध्ये मुलं पळवणारी टोळी, ‘त्या’ घटनेनं भीतीचं वातावरण, समोर आलं धक्कादायक कारण
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तातडीने जमा झाले. त्यांनी संशयित महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
छत्रपती संभाजीनगर : सध्या सोन्याचा दर दीड लाखांच्या पुढे गेला असून छत्रपती संभाजीनगरमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दागिन्यांसाठी मूर्तिजापूर परिसरात महिलांच्या टोळीकडून एका लहान मुलीला पळवण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
मूर्तिजापूर परिसरात रविवारी सायंकाळी एन-6 भागातील एक महिला आपल्या नातेवाईकांकडे भेटायला आली होती. त्यावेळी तिची आठ वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. याच वेळी भिक्षा मागण्याच्या बहाण्याने परिसरात फिरत असलेल्या एका महिलेने मुलीचा हात पकडून तिला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने तिच्या हाताला झटका देत रडतच घराकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तातडीने जमा झाले. त्यांनी संशयित महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडले. दरम्यान, या महिलांची टोळी काही दिवसांपासून बायपास परिसरात झोपड्या टाकून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारपासून त्या घरोघरी जाऊन जेवण, पीठ मागण्याच्या नावाखाली लहान मुलांवर लक्ष ठेवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
advertisement
मुलीला मंदिरात साबुदाणा खिचडी वाटप सुरू असल्याचे सांगून तिला फूस लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, इतर साथीदारांना नागरिकांनी पकडल्याचे लक्षात येताच काही महिलांनी तेथून पळ काढला.
परिसरात तणाव
काही नागरिकांनी महिलांचे मोबाईलवर चित्रीकरण केले आणि संतापाच्या भरात मारहाणीचाही प्रयत्न केला. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले आणि पोलिसांना पाचारण केले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित महिलांना ताब्यात घेतले व चौकशीसाठी ठाण्यात नेले.
advertisement
पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीत संबंधित भिक्षेकरी महिलेने मुलीला सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरमध्ये मुलं पळवणारी टोळी, ‘त्या’ घटनेनं भीतीचं वातावरण, समोर आलं धक्कादायक कारण









