पाणी जपून वापरा! छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 तासांसाठी पुरवठा बंद राहणार, कारण काय?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Water Cut: छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. पुढील 36 तसांसाठी पुरवठा बंद राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. पाइपलाइन दुरुस्तीसाठी शहरात आजपासून (20 मार्च) पासून तब्बल 36 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या काळात रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या खाली 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती, नक्षत्रवाडी पाणीपुरवठा केंद्रासह अन्य छोटी मोठी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराला 2 दिवस पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.
उन्हाळ्यापूर्वी महापालिकेला शटडाऊन घ्यायचे होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता. मागील आठवडचात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली तिरुपती सोसायटीजवळ नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 1100 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत होती. कंपनीकडून मनपाच्या 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे थोडे लिकेज सुरु झाले. मनपा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी करून शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ लागणार आहे.
advertisement
आज सकाळी 11 वाजता शहराचा पाणीपुरवठा जायकवाडीतून बंद करण्यात येईल. त्यानंतर लगेच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली दुरुस्तीचे काम सुरू होईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर एमबीआरमध्येही काम करायचे आहे. याशिवाय फारोळा, जायकवाडी आणि अन्य ठिकाणी लहान-मोठ्या लिकेजची, विद्युत विभागाची दुरुस्ती करण्यात येईल. शुक्रवार सायंकाळपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यानंतर जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू राहील. शुक्रवारी रात्री सर्व जलकुंभ भरून घेऊन शनिवारी सकाळी शहराला सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 20, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पाणी जपून वापरा! छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 तासांसाठी पुरवठा बंद राहणार, कारण काय?








