सीमा खचली नाही, नवऱ्यावरील संकट स्वत:च्या खांद्यावर घेतलं; सुनबाईंचं गावात होतंय कौतुक!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवऱ्यावरील मोठ्या संकटानंतरही न खचता या महिला शेतकऱ्यांनं मोठ्या हिंमतीनं काम केलंय.
जालना, 14 सप्टेंबर : सैराट चित्रपटाच्या निमित्ताने ट्रॅक्टर चालवणारी आर्ची सर्वांनी पहिली असेल. रील लाईफ मध्ये रोल करणे आणि रिअल लाईफ मध्ये ट्रॅक्टर चालवणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. विशेषत: ग्रामीण भागात पुरुषांची कामं महिलांनी केली तर हाय तोबा केली जाते. पण पतीच्या किडनी प्रत्यारोपणानंतर घरातील सर्व कामं आणि शेतीचं एकहाती व्यवस्थापन करण्याचं काम जालनामधील एक महिला करत आहे.
सीमा क्षीरसागर असं या जिगरबाज गृहिणीचं नाव आहे. त्या जालना जिल्ह्यातल्या कडवंची या गावातल्या आहेत. सीमा यांचा 2013 साली सदानंद क्षीरसागर यांच्याशी विवाह झाला. सदानंद यांच्याकडं साडेचार एकर हलकी मध्यम शेती. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी कृषी डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 2015 साली विहिरीतील पाण्याची उपलब्धता पाहून एक एकर द्राक्षांची बाग लावली. त्यानंतर दोन वर्षांनी सरकारी योजनेनुसार खोदकामाच्या अनुदानावर शेततळं घेतलं. दोन वर्षांमध्ये बागेतून चांगलं उत्पन्न येऊ लागले. त्यांना या कामात आई-वडिलांसह पत्नी सीमाृ यांचीही मोलाची मदत मिळत होती.
advertisement
याच कालावधीमध्ये सदानंद यांचं किडनी प्रत्यारोपणाचं मोठं ऑपरेशन झालं. त्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा आली. या खडतर परिस्थितीमध्ये कंबरेला पदर खोचून सीमाताई तयार झाल्या. त्या सदानंद यांच्या मार्गदर्शनाखाली कामं करू लागल्या. द्राक्ष बागेत फूट काढणी, शेणखत, रासायनिक खत देणे, पाणी देणे, घड बांधणे या सर्व शेतीकामामध्ये सीमाताई पारंगत झाल्या. बागेत फवारणी करणे आणि वाहतुकीच्या दृष्टीनं त्या ट्रॅक्टरही चालवायला शिकल्या.
advertisement
एप्रिल, ऑक्टोबर छाटणी तसेच ऑक्टोबरची फूट काढणी वेळेत करावी लागत असल्याने मजुरांची मदत घेतली जाते. नव्याने लागवड केलेल्या डाळिंब बागेतील शेंडा खुडणी, झाडाला आकार देण्यासाठी छाटणी, खुरपणी, वाय कळ्या काढणे आदी सर्व कामे आपण स्वतः करत असल्याचं सीमाताई सांगतात.
advertisement
माझ्या काम करण्यावर मर्यादा आल्यानंतर आपल्या शेतीच काय होईल असा प्रश्न मला पडला होता. पण सीमाने माझ्या मदतीने शेतातील सगळी कामे शिकून घेतल्याने माझ्यावरचा भार कमी झाला आहे. द्राक्ष आणि डाळिंब बागेचं संपूर्ण नियोजन तीच करते, असं सदानंद यांनी सांगितलं. तर सुनबाईनं सर्व जबाबदारी घेतल्यानं समाधान वाटतं, असं त्यांचे सासरे विनायक क्षीरसागर यांनी सांगितलं.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 14, 2023 10:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
सीमा खचली नाही, नवऱ्यावरील संकट स्वत:च्या खांद्यावर घेतलं; सुनबाईंचं गावात होतंय कौतुक!