Kishori Pednekar : ''बाबासाहेबांवर मनाचे श्लोकचा प्रभाव'', किशोरी पेडणेकरांचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकाश आंबेडकरांनीही कान टोचले
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Kishori Pednekar :मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक सक्तीचे करण्याची मागणी बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मात्र, किशोरी पेडणेकर यांच्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक सक्तीचे करण्याची मागणी बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मात्र, आपल्या मागणीच्या समर्थनात उदाहरण देताना किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मनाचे श्लोकचा प्रभाव असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले. मात्र, काही वेळेतच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीदेखील पेडणेकरांचे कान टोचले.
मुंबईतील सर्व शाळांमध्ये, मग त्या खासगी असोत वा महानगरपालिकेच्या, मुलांच्या मनावर चांगले संस्कार होण्यासाठी 'मनाचे श्लोक' शिकवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. चांगला नागरिक घडवण्यासाठी संस्कारांची शिदोरी आवश्यक असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
बाबासाहेब आंबेडकरांवरही प्रभाव...
आपल्या विधानाच्या समर्थनार्थ पेडणेकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण लहानपण पाहिले तर त्यांच्यावरही मनाच्या श्लोकांचा परिणाम झालेला दिसतो. म्हणूनच त्यांनी देशाला असे संविधान दिले जे नागरिकांना त्यांचे अधिकार दाखवते. मला इतिहास बदलायचा नाही, पण आमच्या मनावर या संस्कारांचा पगडा आहे." चांगल्या संविधानाप्रमाणेच चांगला नागरिक घडवण्यासाठी बालपणापासूनच शाळेत हे शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
advertisement
प्रकाश आंबेडकरांनी सुनावलं...
किशोरी पेडणेकर यांच्या या अजब वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. विविध स्तरांवर पेडणेकर यांच्यावर टीका करण्यात आली. तर, दुसरीकडे आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, कोणाला काहीही पचवायचे असेल तर बाबासाहेब आहेत असा टोला लगावला. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मनाचे श्लोकचा प्रभाव होता, असा असा साक्षात्कार कुठल्या पुस्तकात झाला त्यांनी खुलासा करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
advertisement
किशोरी पेडणेकरांची दिलगिरी....
बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाल्यानंतर माजी महापौर, बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपल्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 2:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kishori Pednekar : ''बाबासाहेबांवर मनाचे श्लोकचा प्रभाव'', किशोरी पेडणेकरांचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकाश आंबेडकरांनीही कान टोचले









