Maharashtra Police Bharati : मोठी बातमी! राज्यात 15 हजार पोलीस भरतीला मान्यता, मंत्रिमंडळाचा निर्णय
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Police Recruitment : मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल 14 हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णय झाला आहे.
राहुल झोरी, प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज संपली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल 15 हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णय झाला आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत 15 हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिने थांबलेल्या भरती प्रक्रियेला वेग येणार असून, पोलिस दलाला ताज्या दमाचे मनुष्यबळ मिळणार आहे.
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे ती लांबणीवर गेली. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे.
या भरतीद्वारे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तसेच शहरातील हजारो उमेदवार पोलीस दलात सामील होण्यासाठी सज्ज आहेत. महायुती सरकारने राज्यातील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
पोलिस दलात ताज्या आणि ऊर्जावान तरुणांचा समावेश झाल्याने कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांचा समावेश असणार आहे. तसेच पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा मानस आहे.
महायुती सरकार आल्यानंतर पोलीस भरतीच्या तारखेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरला आहे.
advertisement
एकनाथ शिंदे, भरत गोगावले अनुपस्थित...
शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्या कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित होते. एकनाथ शिंदे हे श्रीनगर मध्ये आहेत. शिवसेना शिंदे गटाने सोमवारी जम्मूमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यानिमित्ताने शिंदे हे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावलेदेखील अनुपस्थित होते. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले. आपला दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हजर राहणे शक्य नव्हते. एखाद्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने पालकमंत्री ठरत नसतो, असेही गोगावले यांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 11:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Police Bharati : मोठी बातमी! राज्यात 15 हजार पोलीस भरतीला मान्यता, मंत्रिमंडळाचा निर्णय


