ZP Election: ...तर गेम ओव्हर! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या निर्णयाने राजकारण तापलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Zilla Parishad and Panchayt Samiti Election : एका निर्णयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. राज्य सरकारच्या एका निर्णयाने इच्छुकांचा मतदानापूर्वीच गेम ओव्हर होणार आहे.
मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याआधीच एका निर्णयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. राज्य सरकारच्या एका निर्णयाने इच्छुकांचा मतदानापूर्वीच गेम ओव्हर होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळल्यास तो निर्णय अंतिम मानण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही. यासंदर्भातील अध्यादेशाच्या मसुद्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सरकारने या निर्णयाचे समर्थन केले असले तरी विरोधकांनी तीव्र टीका केली आहे.
advertisement
राज्यपालांच्या संमतीनंतर हा अध्यादेश तात्काळ जारी करण्यात येणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये हा नवा नियम लागू होणार आहे. सध्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील कलम १४ च्या पोटकलम (२) नुसार, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास किंवा नकार देण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद होती. मात्र, विविध जिल्हा न्यायालयांमध्ये अशी अपिले वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेत घेणे कठीण जात होते.
advertisement
कोर्टात दाद का मागता येणार नाही?
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित तरतूद वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. निवडणूक प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि निवडणुका कालबद्ध पद्धतीने पार पाडता याव्यात, या कारणास्तव मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
याचिकांमुळे नगर परिषदांच्या निवडणुका रखडल्या...
दरम्यान, अलीकडे पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जांवरील निर्णयांना मोठ्या प्रमाणावर जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी थेट नगराध्यक्ष तसेच प्रभागांतील नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अखेर या निवडणुकांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
advertisement
विरोधकांचा आक्षेप...
निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आल्याने राज्य निवडणूक आयोगावरही टीका झाली होती. आता नव्या अध्यादेशामुळे निवडणूक प्रक्रियेत येणारे अडथळे दूर होतील, असा सरकारचा दावा असला तरी लोकशाही हक्कांवर गदा येईल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अधिकारी हा शासकीय कर्मचारी असतो. एखाद्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारणे, फेटाळणे यासाठी त्याच्यावर सरकारमधून राजकीय दबाव येऊ शकतो. त्यामुळे अर्ज फेटाळल्याने अन्याय झाल्याची भावना मनात असलेल्या उमेदवारांना कोर्टात दाद मागता येत होती, आता हा मार्ग बंद झाला असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 9:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election: ...तर गेम ओव्हर! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या निर्णयाने राजकारण तापलं









