Pitru Paksha 2025: गेले कावळे कुणीकडे? पितृ पक्षात सगळेच हैराण
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांसाठी केलेल्या पिंडदानाला आणि ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवणे फार महत्त्वाचं मानलं जातं.
छत्रपती संभाजीनगर: यंदा मुसळधार पावसामुळे शेतीचं आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टीचा फटका फक्त माणसालाच नाही तर पक्ष्यांना देखील बसला आहे. अनेक पक्ष्यांची घरटी वाहून गेली, अंडी फुटली आणि पिलं दगावली आहेत. त्यामुळे कावळे आणि इतर पक्षी गाव सोडून दुसरीकडे गेले आहेत. याचाच परिणाम म्हणून पितृपक्षाच्या विधीत पिंडाला कावळा शिवत नाही. श्रद्धाळू कित्येक तास कावळा येण्याची वाट पाहतात, पण कावळा येतच नाही. छत्रपती संभाजीनगरमधील पक्षी अभ्यासक कुणाल विभांडिक यांनी लोकल 18शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावर्षी मराठवाड्यातील 640 गावांमध्ये 14 व 15 सप्टेंबरला अतिवृष्टीची नोंद झाली. 32 मंडळांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाच्या माऱ्याने पक्ष्यांची घरटी मोडून पडली आहेत. परिणामी अनेक घरट्यांमधील अंडीही फुटली आहेत. कावळे साधारणपणे नजीकच पण, जिथे काळे ढग, पाऊस नाही अशा ठिकाणी तात्पुरतं स्थलांतर करतात.
advertisement
पैठणच्या जांभूळबन आदी भागांत पावसानं मोठं नुकसान झालं आहे. या भागात कावळ्यांची संख्या चांगली असते. सध्या याठिकाणी कावळे दिसत नाहीत. ते इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. शिवाय जायकवाडी प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस आणि पाण्याचा विसर्ग थांबल्यानंतर स्थलांतरित झालेले कावळे परत येतील.
पक्षी अभ्यासक कुणाल विभांडिक म्हणाले, "नदीच्या किनारी किंवा घाटावरती मोठ्या प्रमाणात कावळे असतात. कारण, दशक्रिया विधी आणि इतर कारणांमुळे नदीच्या घाटावरती त्यांना खायला भरपूर अन्न मिळतं. पण, सध्या अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी पूर आला असून नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. त्यामुळे अनेक पक्षांनी स्थलांतर केलं आहे. या सर्व कारणांमुळे पितृ पक्षात कावळ्यांची संख्याही कमी झालेली दिसत आहे."
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 19, 2025 4:42 PM IST