BMC: "महापौरांच्या विरोधात नक्की चाललंय काय?", मिलिंद नार्वेकरांचा एक प्रश्न अन् भाजपमध्ये खळबळ
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Mumbai: मुंबई महानगरपालिकेतून (BMC) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता खेचून आणणाऱ्या भाजपमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतून (BMC) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता खेचून आणणाऱ्या भाजपमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत सत्ता तर आली, मात्र आता भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्वीटने चर्चांना उधाण आले आहे.
नार्वेकरांचा सवाल, "नक्की काय चाललंय?"
मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या संदर्भात एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महापौरांविरोधातील दोन बातम्यांची कात्रणे जोडली असून, "नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?" असा थेट सवाल उपस्थित केला आहे. नार्वेकर यांच्या या प्रश्नामुळे भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? pic.twitter.com/cHQgjhbM09
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) March 15, 2026
महापौरांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जातेय?
नार्वेकर यांनी शेअर केलेल्या बातम्यांच्या कात्रणांवरून असा संकेत मिळत आहे की, स्वतःच्याच पक्षातील काही गट महापौरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत. विशेषतः महापौरांच्या कारवरील लाल आणि निळ्या दिव्यांच्या वापरावरून सध्या जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहेत. महापौरांच्या अधिकारांवरून किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातच दोन गट पडले आहेत का, अशी शंका या ट्विटमुळे अधिक गडद झाली आहे.
advertisement
मुंबई महापालिकेतून सत्ता गेल्यानंतर आता ठाकरे गट भाजपमधील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे. भाजपमधील संभाव्य गटबाजीवर बोट ठेवून नार्वेकरांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. एकीकडे महापौरांना सहानुभूती दर्शवणे आणि दुसरीकडे भाजपमधील विसंवाद चव्हाट्यावर आणणे, असा दुहेरी डाव यामागे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनाई आदेश असताना महापौरांनी अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्या पत्रानंतर भाजपात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: "महापौरांच्या विरोधात नक्की चाललंय काय?", मिलिंद नार्वेकरांचा एक प्रश्न अन् भाजपमध्ये खळबळ










