Nanded News : मराठा आंदोलन हिंसक वळणावर? नांदेडमध्ये खासदाराची गाडी फोडली, काय आहे प्रकरण?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nanded News : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केल्याने मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र झाल्याचे दिसत आहे.
नांदेड, 27 ऑक्टोबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचे आंदोलन आता हिंसक वळण घेत आहे. गाव बंदी असताना गावात आल्याने नांदेडमध्ये खासदाराची गाडी फोडण्यात आली. नांदेडसह राज्यात अनेक ठिकाणी अश्या घटना होत आहेत. नेत्यांविरोधात समाज आक्रमक झाल्याने पुढाऱ्यांची कोंडी झाली आहे. मात्र, सार्वजानिक आणि राजकीय कार्यक्रम वगळता कुठल्याच कारणासाठी नेत्यांनी गावात येऊ नये का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजप खासदाराची गाडी फोडली
मराठा आरक्षणासाठी दोन दिवसापासुन मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा म्हणुन राज्यभरात सकल मराठा समाजाकडून विविध आंदोलन सुरू आहेत. त्यात नेत्यांना गाव बंदीचे निर्णय मोठ्या प्रमाणात गावा गावात घेतले जात आहेत. आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्याने गावात येऊ नये, असा इशारावजा बॅनर गावाच्या शिवेत लावले जात आहेत. नांदेडमधील कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात देखील नेत्याच्या गाव बंदीचा निर्णय झाला आहे. या गावात भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर काल रात्री गेले होते. तेव्हा त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. गावातील तरुणांनी चिखलीकर आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या. गावबंदीला विरोध नाही. सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमाच्या बंदिला माझा पाठिंबा आहे. पण आपण आजारी मित्राला भेटण्यासाठी गावात गेलो होतो. आजारी नातेवाईक, कार्यकर्ते यांना भेटणे, अंत्यविधीला पुढाऱ्यांनी जायच नाही का? असा प्रश्न चिखलीकर यांनी विचारला. हा उद्रेक योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
advertisement
नांदेड जिल्ह्यात हा प्रकार पहिल्यांदा घडला नाही. काँगेस नेते अशोक चव्हाण यांना देखील आपल्याच जिल्ह्यात दोन वेळा मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. धर्माबादमध्ये आयोजित काँगेस कमिटीच्या बैठकीसाठी अशोक चव्हाण गेले असता त्यांना घेराव घालून त्यांचा निषेध करण्यात आला होता. दसऱ्याच्या दिवशी अशोक चव्हाण यांच्या स्वतःच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामात देखील त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्यात मोठ्या प्रमाणात गाव बंदी करण्यात आली आहे. नेत्यांनी गावात येऊच नये अशी भूमिका समाजाकडून घेण्यात आली. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी देखील गाव बंदीचे समर्थन केले आहे. आमच्या गावात येताच कश्याला, नेते गावात येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
advertisement
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 250 हुन अधिक गावात नेत्याच्या गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही कारणासाठी नेते, पुढारी गावात येऊच नये अशी भूमिका समाजाने घेतली आहे. त्यातच नेते गावात येत असल्याने कायदा, सुव्यवस्था बिघडत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच पक्षातील नेत्यांना गावात जाणे महागात पडण्याची शक्यता आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
October 27, 2023 5:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : मराठा आंदोलन हिंसक वळणावर? नांदेडमध्ये खासदाराची गाडी फोडली, काय आहे प्रकरण?