Onion Farm: पावसाचं थैमान! शेतातच सडला कांदा, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल, सोलापुरात मोठं नुकसान
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Onion Farm: गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापुरातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत.
सोलापूर: राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावचे तरुण शेतकरी ओंकार चौरे यांच्या कांदा शेतीला या पावसाचा फटका बसला आहे. कांद्याच्या शेतीत पाणी असून कांदा सडला आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
हराळवाडी गावातील शेतकरी ओंकार चौरे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. पण सोलापूर जिल्ह्यात मागील 15 ते 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे कांदा पिकावर करपा रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाती खराब झाल्या असून पिवळ्या पडल्या आहेत. जेवढा कांद्याच्या लागवडीसाठी खर्च केला होता तेवढा खर्च निघणार नसल्याची खंत शेतकरी ओंकार चौरे यांनी व्यक्त केली.
advertisement
एक एकर कांदा लागवडीसाठी 80 हजार रुपयांपर्यंतचा खर्च ओंकार चौरे यांना आला होता. सतत पाऊस पडला नसता तर हा कांदा दहा ते बारा दिवसांत विक्रीसाठी बाजारात जाणार होता. एका एकरातून 100 पिशव्या कांदा निघणार होता. तर सर्व खर्च वजा करून कांदा विक्रीतून तरुण एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार होते. परंतु या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले असून ओंकार यांनी पाहिलेल्या सर्व स्वप्नांचा चिखल झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी चौरे यांनी केलीये.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Sep 21, 2025 9:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Onion Farm: पावसाचं थैमान! शेतातच सडला कांदा, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल, सोलापुरात मोठं नुकसान









