Thane News: पावसाचं थैमान! पूलच गेला वाहून, शहापूर-मुरबाड रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane News: ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीवरील सापगाव पूल वाहून गेला आहे. त्यामुळे शंभर गावांतील वाहतुकीला फटका बसला आहे.
ठाणे : गेल्या काही काळात राज्यासह ठाणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सापगावजवळील भातसा नदीवरचा पूल पाण्यात वाहून गेला. त्यामुळे पुलावरून वाहतुकीस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला असून गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
सध्या सापगाव पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. तरीही या मार्गावरून दुचाकी वाहनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जड व अवजड वाहनांसाठी प्रवेश दिला जात नाही. पुलाचे दोन्ही बाजूकडील कठडे तुटले असून पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. रुंदीने कमी असलेल्या पुलावरून वाहतूक सुरू असताना दोन्ही बाजूने वाहने आल्यास मोठ्या अपघाताचा धोका आहे. त्यामुळे जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीस मज्जाव करण्यात आला आहे.
advertisement
गावात बस नाही
भातसा नदीवरील पूल वाहून गेल्याचा एसटी बसला फटका बसला आहे. शहापूर बस आगारातून सोमवारी एकही बस सापगाव मार्गे सोडण्यात आली नाही. या आगारातून 25 पेक्षा अधिक बस गावांत जातात, असे आगार प्रमुख मानसी शेळके यांनी सांगितले.
वाहतूक ठप्प, नागरिकांचे हाल
शहापूर - मुरबाड वाहतूक सापगाव मार्गे बंद राहिल्याने तालुक्यातील शेणवा, किन्हवली, डोळखांब आदी महत्त्वाच्या गावांसह शंभराच्या आसपास लहान मोठ्या गावांशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे शहापूर, आसनगाव, पडघे, भिवंडी, कल्याण, मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या ग्रामीण भागातील नोकरदार, रोजंदारी कामगार, रिक्षा प्रवासी, खासगी वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहेत. पुलाची डागडुजीचे काम सुरू असून येत्या दोन दिवसांत वाहतूक सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न असल्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 30, 2025 10:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane News: पावसाचं थैमान! पूलच गेला वाहून, शहापूर-मुरबाड रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी