महाबळेश्वर, माथेराननंतर मुंबई, अचानक हवा बिघडली, मुंबईकराचं टेन्शन वाढलं, काय घडतंय?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर गेला तर बांधकामांवर निर्बंधांसह कडक कारवाई करण्यात येईल,
मुंबई: नवीन वर्ष सुरू झाले असले तरी मुंबईकरांना प्रदूषणाच्या समस्येतून दिलासा मिळालेला नाही. दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांपर्यंत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बांधकामांसह हवामानातील बदल यांचा एकत्रित परिणाम म्हणून शहरावर सलग तिसऱ्या दिवशी धुरक्याची चादर पसरली होती. काल म्हणजेच मंगळवारी अनेक भागांत दृश्यमानता तब्बल 500 मीटरच्या आत मर्यादित राहिली.
मुंबईत थंडीच्या दिवसांत दिसणाऱ्या धुरक्यामुळे वातावरण गडद झाले असून, महाबळेश्वर आणि माथेरानप्रमाणेच मुंबईतही सलग तीन दिवस धुके नोंदविले गेले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी रस्ते, उंच इमारती आणि दूरवरची दृश्ये अस्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत कायम आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून वाढलेले प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत असल्याचे दिसून येत असून अनेकांना खोकला, श्वसनाचे त्रास आणि इतर लक्षणांना सामोरे जावे लागत आहे.
advertisement
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर गेला तर बांधकामांवर निर्बंधांसह कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या मात्र हवेचा दर्जा मध्यम स्वरूपात असल्याने तातडीची बंदी आवश्यक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रदूषणकारी आरएमसी प्लांटवर धडक मोहीम
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत चार आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट बंद करण्यात आले असून 1 कोटी 89 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, तुर्भे (नवी मुंबई) येथील दीपक स्टोन कंपनी, क्रिस्टल काँक्रीट इन्फ्रा, सलोनी कन्स्ट्रक्शन तसेच भिवंडीतील फॉम रॉक एलएलपी या प्लांटवर कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही पावले उचलण्यात आली. डिसेंबरपासून आतापर्यंत एकूण 196 आरएमसी प्लांटची तपासणी करण्यात आली असून, या कालावधीत सुमारे 3.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 59 प्लांटना प्रस्तावित तर 34 प्लांटना अंतरिम निर्देश देण्यात आले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 9:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
महाबळेश्वर, माथेराननंतर मुंबई, अचानक हवा बिघडली, मुंबईकराचं टेन्शन वाढलं, काय घडतंय?









