Weather Alert: जानेवारीत पुन्हा वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, आता पाऊस नाही वेगळाच अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. अवकाळी संकटानंतर आता पुन्हा हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आता हळूहळू निवळत असून हिवाळ्याचा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होत असून अनेक भागांत गारठा वाढू लागला आहे. मंगळवार, 7 जानेवारी रोजी महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता नाही. मात्र, सकाळच्या वेळेत काही ठिकाणी धुक्याचा परिणाम जाणवू शकतो.
advertisement
कोकण विभागात आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळच्या वेळेत हलके धुके दिसून येऊ शकते. मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. दिवसभर सूर्यप्रकाश असल्याने दिवस उष्ण वाटू शकतो, मात्र सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल. समुद्रकिनारी भागांत आर्द्रता जास्त असल्याने थंडीची तीव्रता तुलनेने कमी भासू शकते.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे. पुण्यात किमान तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गारठा जाणवेल. सातारा, सांगली, कोल्हापूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागांत रात्री थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज असून विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान 9 अंशांच्या खाली जाऊ शकते. नागपूर, अमरावतीसह विदर्भात शीतलहर जाणवण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत दाट धुके पडू शकते, तर दिवसभर हवामान कोरडे राहणार आहे.
advertisement
दरम्यान, 7 जानेवारीपासून राज्यात हिवाळ्याची खरी चाहूल लागली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे. राज्यातील हवामान पुढील दोन ते तीन दिवस कोरडेच राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्यास किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.








