खासगी बस 60 मीटर दरीत कोसळली, 12 जण जागेवर ठार; 33 प्रवासी गंभीर जखमी, बसचे अक्षरशः तुकडे झाले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Himachal Bus Accident: हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधार परिसरात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताने राज्य हादरले आहे. या दुर्घटनेत किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नाहन / सिरमौर: हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात भीषण बस अपघात झाला असून, या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. हरिपूरधार परिसरात खासगी ‘जीत कोच’ बस तब्बल 60 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. बसमध्ये एकूण 45 ते 60 हून अधिक प्रवासी असल्याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
advertisement
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मदतीसाठी स्थानिक नागरिक धावून आले आणि जखमींना बसच्या अवशेषांतून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. माहिती मिळताच एसपी सिरमौर निश्चित सिंग नेगी स्वतः घटनास्थळी रवाना झाले. उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही या दुर्घटनेची अधिकृत माहिती दिली आहे.
advertisement
कसा झाला अपघात?
प्राथमिक माहितीनुसार, रेणुकाजी विधानसभा क्षेत्रातील हरिपूरधार बाजाराजवळ हा अपघात झाला. शिमला येथून कुपवीकडे जाणारी ‘जीत कोच’ खासगी बस रस्त्यावरून घसरून थेट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसचे अक्षरशः तुकडे झाले. बस खचाखच भरलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
advertisement
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र वळणदार रस्ता, उतार आणि संभाव्य वेग हे घटक कारणीभूत असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

मृतांचा आकडा बदलत राहिला
advertisement
अपघातानंतर सुरुवातीला मृतांचा आकडा 7 सांगण्यात आला होता. मात्र नंतर मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी 8 मृत्यूमुखी झाल्याचे सांगितरे, तर रात्रीपर्यंत हा आकडा वाढून 12 पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
रुग्णालयातील सुविधांवर संताप
सर्व जखमींना प्राथमिक उपचारांसाठी हरिपूरधारच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे अनेकांना नाहन, संगडाह आणि ददाहू येथील रुग्णालयांत हलवावे लागले. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, या रुग्णालयाला पूर्वी ‘अप्पर हॉस्पिटल’चा दर्जा होता, मात्र सुक्खू सरकारने तो दर्जा रद्द (डिनोटिफाय) केला. त्यामुळे गंभीर अपघातात वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी आल्या.
advertisement

प्रशासन अलर्ट, सुरक्षा वाढवली
जिल्हा प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर आहे. नाहन, संगडाह आणि ददाहू येथील रुग्णालयांना तत्काळ अलर्ट देण्यात आला आहे. पाच जखमींना उच्च उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री म्हणाले, “हरिपूरधार येथे खासगी बस दरीत कोसळून अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”
सिरमौरचे मंत्री व शिलाईचे आमदार हर्षवर्धन चौहान यांनी सांगितले की, “अपघाताचे कारण तपासले जात आहे. जिल्हा प्रशासन पूर्ण अलर्ट आहे.”
मुख्यमंत्री सुक्खू यांचे आदेश
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. “हरिपूरधारजवळ झालेल्या या भीषण बस अपघाताची बातमी मन सुन्न करणारी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल, खासदार अनुराग ठाकूर, सुरेश कश्यप यांच्यासह अनेक नेत्यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही घटना संपूर्ण हिमाचलसाठी धक्का देणारी आहे,” अशी प्रतिक्रिया राजीव बिंदल यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 7:53 PM IST
मराठी बातम्या/देश/
खासगी बस 60 मीटर दरीत कोसळली, 12 जण जागेवर ठार; 33 प्रवासी गंभीर जखमी, बसचे अक्षरशः तुकडे झाले










