Air Ambulance Crash : दुसऱ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरचा मृत्यू, 8 वर्षांचा मुलगा झाला पोरका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
झारखंडची राजधानी रांचीमध्ये सोमवारी संध्याकाळी घडलेली एअर ॲम्ब्युलन्सच्या दुर्घटनेमुळे खूप मोठं नुकसान झालं. या भीषण अपघातात गंभीर रुग्णासह ज्या 7जणांचा मृत्यू झाला.
रांची : आपण जेव्हा आजारी पडतो, तेव्हा 'डॉक्टर' आपल्यासाठी देवाचे रूप असतात. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, तातडीच्या परिस्थितीत रुग्णाला वाचवण्यासाठी जे धावून जातात, त्यांनाच आपण 'खरे हिरो' मानतो. पण, विधात्याची चक्रं कधीकधी इतकी क्रूर असतात की, दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी निघालेला हाच देवदूत काळाच्या पडद्याआड जातो.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये सोमवारी संध्याकाळी घडलेली एअर ॲम्ब्युलन्सच्या दुर्घटनेमुळे खूप मोठं नुकसान झालं. या भीषण अपघातात गंभीर रुग्णासह ज्या 7जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये एक असं नाव होतं ज्यांनी रांचीच्या वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते म्हणजे डॉ. विकास कुमार गुप्ता.
डॉ. विकास गुप्ता हे 'क्रिटिकल केअर ॲनेस्थेसिया'मधील तज्ज्ञ होते. लातेहार येथील 65% भाजलेल्या संजय कुमार नावाच्या रुग्णाला अधिक उपचारांसाठी रांचीहून दिल्लीला हलवण्यात येत होतं. 'रेडबर्ड एअरवेज'च्या या विमानामध्ये डॉ. विकास केवळ आपली ड्युटी करत नव्हते, तर त्या मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला जीवनदान देण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावत होते. मात्र, चतरा जिल्ह्यातील सिमरिया येथील घनदाट जंगलात खराब हवामानामुळे हे विमान कोसळलं आणि या प्रवासाचा शेवट एका भीषण शोकांतिकेत झाला.
advertisement
मूळचे बिहारचे असलेले डॉ. विकास गेल्या अनेक वर्षांपासून रांचीमध्ये स्थायिक होते. कचहरी परिसरात ते आपली पत्नी आणि अवघ्या 8 वर्षांच्या लहान मुलासोबत राहत होते. त्यांची पत्नी एसबीआयच्या कचहरी शाखेत कार्यरत आहेत. रांचीचे प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश आणि सर्वसामान्यांमध्ये डॉ. विकास हे अत्यंत आदराचे नाव होते. अत्यंत शांत स्वभाव आणि आणीबाणीच्या काळात रुग्णाला सावरण्याचे त्यांचे कसब यामुळे त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते. मात्र, आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आणि लहानग्या लेकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
या दुर्घटनेने रांची आणि बिहारमधील वैद्यकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्याचसोबत, या अपघाताने काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. विशेषतः रांची आणि पाटणा यांसारख्या शहरांतून लहान विमानांचे टेक-ऑफ आणि खराब हवामानातील उड्डाण हे आव्हानात्मक ठरतंय का?
सध्या 'ब्लॅक बॉक्स' सापडला आहे DGCA आणि AAIB ची पथकं या अपघाताचा सखोल तपास करत आहेत. तांत्रिक बिघाड होता की हवामानाचा अंदाज चुकला, हे तपासात समोर येईलच; पण रांचीने आपला एक मौल्यवान हिरा गमावला आहे, हे मात्र सत्य.
advertisement
डॉ. विकास गुप्ता यांची उणीव रांचीच्या क्रिटिकल केअर क्षेत्राला दीर्घकाळ भासेल. जो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आकाशात झेपावला, त्याच्या या बलिदानाची दखल वैद्यकीय इतिहास नक्कीच घेईल. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, हीच संपूर्ण रांचीची प्रार्थना आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 4:14 PM IST
मराठी बातम्या/देश/
Air Ambulance Crash : दुसऱ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरचा मृत्यू, 8 वर्षांचा मुलगा झाला पोरका









