बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, नितीश कुमारांचं CM पद धोक्यात? भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Bihar Election 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि महागठबंधन आघाडीचं जागा वाटप झालं आहे. उमेदवार आता अर्ज दाखल करत आहेत. आता १४ नोव्हेंबरला बिहारमध्ये कुणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. जर एनडीए निवडणूक जिंकली तर नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. तथापि, निवडणूक जिंकल्यानंतर तेच मुख्यमंत्री होतील? अशी शक्यता खूपच कमी असल्याचं बोललं जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. भाजपकडून बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार असल्याची चर्चा आहे.
भाजपकडून बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?
खरं तर, 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रं दिली. संख्याबळ पाहून भाजपने आपला मुख्यमंत्री ठरवला. आता असाच पॅटर्न बिहारमध्ये देखील राबवण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत स्वत: गृहमंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
advertisement
अमित शाह नक्की काय म्हणाले?
पाटणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री शाह यांना नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं, "मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करायची? हे ठरवणारा मी कोण आहे? एनडीए इतक्या पक्षांची युती आहे. निवडणुकीनंतर विधिमंडळ पक्षाचे नेते भेटून त्यांचा नेता ठरवतात. पण सध्या आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. नितीश कुमार आमच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत आहेत.
advertisement
नितीन गडकरी काय म्हणाले?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी न्यूज18 इंडियाच्या "चौपाल" कार्यक्रमादरम्यान एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी दावा केला की बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होईल, परंतु नितीश कुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती निवडणूक निकालानंतर निश्चित केली जाईल. या निर्णयासाठी भाजप, जेडीयू आणि एनडीए हायकमांडची संमती आवश्यक असेल यावर त्यांनी भर दिला. निवडणुकीनंतर नितीश कुमार बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील? असं विचारलं असता गडकरी म्हणाले, "हे बघा, आमचे एनडीए सरकार नक्कीच येईल. निवडणुकीत जिंकलेले आमदार, एनडीए, जेडीयू आणि भाजपचे हायकमांड मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. मी एकमेव हायकमांड नाही जो काहीही ठरवू शकतो. अशा निर्णयांमध्ये संसदीय मंडळाचा सहभाग असतो, असंही गडकरी म्हणाले.
advertisement
मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर सस्पेन्स
या दोन्ही विधानांमुळे नितीश कुमार निवडणूक जिंकल्यानंतरही खरोखर मुख्यमंत्री राहतील का याबद्दलचा सस्पेन्स वाढला आहे. एनडीएने स्पष्ट केले आहे की नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जात आहे, परंतु निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यात बदल शक्य आहे. तथापि, निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी येणार आहेत आणि तोपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे. त्यामुळे आता भाजप बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवणार असल्याचं देखील बोललं जातंय.
view commentsLocation :
Patna,Bihar
First Published :
October 17, 2025 7:57 AM IST
मराठी बातम्या/देश/
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, नितीश कुमारांचं CM पद धोक्यात? भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स