Bangladesh Violence : हिंदूंवर हल्ले, रस्त्यावर रक्तपात; शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात आणखी 100 जण ठार
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
बांगलादेशात अराजक निर्माण झालं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तिथले नागरिक रस्त्यावर उतरले असून, हिंसाचार सुरू आहे.
ढाका : बांगलादेशात अराजक निर्माण झालं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तिथले नागरिक रस्त्यावर उतरले असून, हिंसाचार सुरू आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडला आहे. तरीदेखील बांगलादेशात शांतता निर्माण झालेली नाही. शेख हसीना यांनी देश सोडल्यावर सोमवारी रात्रीदेखील ढाक्यात अशांतता होती. तिथल्या हिंदू मंदिरांनादेखील लक्ष्य केलं गेलं.
शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरदेखील बांगलादेशातला हिंसाचार थांबला नाही. गेल्या 24 तासांत बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात 100हून जास्त जणांचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांतल्या वृत्तानुसार, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर सोमवारी रात्री ढाक्यातली स्थिती चिंताजनक होती. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. नेते, अधिकारी, तसंच अनेक संस्थांवर हल्ले झाले. हिंदू मंदिरांनादेखील लक्ष्य केलं गेलं.
advertisement
बांगलादेशात आंदोलक केवळ पंतप्रधानात निवासात घुसले नाहीत, तर राजधानी ढाका आणि शहराबाहेर हसीना यांच्या अवामी लीग सरकारमधले मंत्री, पक्षाचे खासदार आणि नेत्यांची निवासस्थानं, तसंच व्यावसायिक आस्थापनांवरदेखील हल्ले करण्यात आले. अनेक शासकीय कार्यालयांना आग लावण्यात आली. स्थानिक माध्यमांतल्या वृत्तानुसार, राजधानी तसंच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. तसंच मोठ्या प्रमाणावर लूटमार करण्यात आली. यात सुमारे 100 जण मारले गेले.
advertisement
सत्तापालट आणि हिंसाचारामुळे सध्या बांगलादेश जोरदार चर्चेत आहे. बांगलादेशात हिंसा आणि जाळपोळीत आंदोलकांनी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हिंदूंची घरं, दुकानं पेटवून दिली जात आहेत. तसंच बांगलादेशातल्या हिंदू मंदिरांनादेखील लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेशातल्या मेहरपूर इस्कॉन मंदिरात आग लावण्यात आली. खरं तर ही पहिली घटना नाही. यापूर्वी 2021, 2022 आणि आता 2024 अशा गेल्या चार वर्षांत बांगलादेशातल्या इस्कॉन मंदिरावर तीन वेळा हल्ला झाला आहे.
advertisement
बांगलादेशात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंचा छळ सुरू आहे. बांगलादेशाच्या लोकसंख्येत हिंदूंचा वाटा 1951मधल्या 22 टक्क्यांवरून 2022मध्ये आठ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मुस्लिमांची लोकसंख्या 1951मधल्या 76 टक्क्यांवरून आता 91 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.
शेख हसीना यांनी राजीनामा देण्यापूर्वी बांगलादेशात 24 तासांत 100पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे वळवला. एका वृत्तानुसार, 16 जुलैपासून आतापर्यंत बांगलादेशात सुमारे 500 जणांची हत्या झाली आहे. रुग्णालायातून जी छायाचित्रं समोर आली आहेत, त्यात बहुतांश जणांना गोळ्या लागल्याचं दिसतं. हजारो जण जखमी झाले आहेत.
advertisement
'ढाका ट्रिब्युन' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाल्यावर राजधानी ढाकाबाहेरच्या सावर आणि धमराई परिसरात कमीत कमी 18 जण मारले गेले. सोमवारी उत्तर भागात आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला. ''देशात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत करा. सशस्त्र दलांनी नागरिकांचं जीवन, मालमत्ता आणि सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करा,'' असे निर्देश राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत.
advertisement
हिंसाचाराच्या घटनांदरम्यान काही दिलासादायक घटनादेखील घडल्या. दीर्घ काळापासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था मंगळवारी पुन्हा सुरू झाल्या; पण ढाक्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. राजधानीतल्या मोहम्मदपूर परिसरात किशोलोय गर्ल्स स्कूलने दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचं म्हटलं आहे; पण हळूहळू स्थिती पूर्वपदावर येईल.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
August 06, 2024 11:53 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Bangladesh Violence : हिंदूंवर हल्ले, रस्त्यावर रक्तपात; शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात आणखी 100 जण ठार


