वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी सोडलं, सुपरहिट फिल्मही हातची गेली, पण आज या अभिनेत्याची होतेय देशभरात चर्चा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actor : वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी सोडलेल्या एका स्टार किडची सध्या देशभरात चर्चा आहे. विशेष म्हणजे स्टार किड असूनही या अभिनेत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
सिने-इंडस्ट्रीतील काही कलाकार नशिबाने लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि आपल्या कामामुळे रातोरात सुपरस्टार होतात. यात हृतिक रोशन, अहान पांडे अशा स्टार किड्सचाही समावेश आहे. तर मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, राजपाल यादव यांसारख्या कलाकारांना दशकानुदशके संघर्ष करुन ओळख मिळवावी लागते. खुशी कपूरसारखे काही जण सतत चित्रपट करत असूनही त्यांना योग्य त्या प्रसिद्धीसाठी वाट पाहावी लागते. पण या सगळ्यात 1997 मधील अभिनेता अक्षय खन्ना मात्र निराळा ठरतो.
advertisement
अक्षय खन्ना हा स्वत: एक स्टार किड आहे. एकेकाळी अमिताभ भच्चन यांचे एकमेव प्रतिस्पर्धी मानले जायचे अशा दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचा तो मुलगा आहे. मात्र अक्षयचं पदार्पण झगमगाटात झालं नाही. पण त्याने शांतपणे स्वतःची ओळख निर्माण केली आणि जवळपास 30 वर्षांनंतर, त्याचं कौतुक अखेर होत आहे. 2025 हे वर्ष अक्षय खन्नासाठी मैलाचा दगड ठरलं आहे. 'धुरंधर'मधील त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होत आहे. पण फैसला गाण्यावरचा त्याचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो ‘नॅशनल क्रश’ ठरला आहे. अक्षय खन्नाची 'छावा'मधील औरंगजेबची थरकाप उडवणारी भूमिका इंडस्ट्रीच्या नजरेत भरली. त्यानंतर 'धुरंधर'मधील रहमान डकैतच्या भूमिकेच्या माध्यमातून त्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. वयाच्या 50 व्या वर्षी, काहीही गोंगाट न करता तो 2025 गाजवणारा स्टार ठरला आहे. जवळपास 30 वर्षांच्या कारकिर्दीनंतरही अक्षयची फिल्मोग्राफी तुलनेने कमी आहे. त्याने फक्त 48 चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. तो कधीच सतत मुलाखती देणारा किंवा प्रसिद्धीच्या मागे धावणारा अभिनेता नव्हता. अनेकदा तो दीर्घ काळासाठी गायब राहिलाय.
advertisement
"माझ्यासाठी काम न मिळणं ही खूप वाईट गोष्ट आहे. तो नैराश्याचा काळ असतो,” असं अक्षय खन्ना मिड-डेला म्हणाला होता. "मी सहा महिन्यांच्या सुट्टीकडे पाहणारा माणूस नाही. पण नशिबाने तसे डाव मांडले की मला जबरदस्तीचे ब्रेक घ्यावे लागले. जेव्हा मनाला भिडणारं काम मिळत नाही, तेव्हा खूप अवघड जातं.”, असंही अक्षय खन्ना म्हणाला होता.
advertisement
सिने घराण्यात जन्म झाल्यामुळे अक्षयला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. “मला फक्त माहीत होतं,” असं त्याने सिमी गरेवाल यांना सांगितलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अक्षय खन्ना HR कॉलेजमध्ये दाखल झाला. पण परिक्षेत नापास झाल्याने पालकांनी त्याला ऊटीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये 11वी-12वीसाठी पाठवलं. “मी फार शिकलेला नाही,” असं त्याने अनेकदा प्रामाणिकपणे मान्य केलंय. विनोद खन्ना अक्षय पाच वर्षांचा असताना ओशो संप्रदायात सामील होण्यासाठी कुटुंब सोडून गेले, तरी अभिनयाची प्रेरणा त्याला वडिलांकडूनच मिळाली. अक्षय म्हणतो,"मी वडिलांच्या सेटवर खूप वेळ घालवला. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मला स्टेज फियर आहे. 1997 मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटातून मी पदार्पण केलं. वडिलांनीच या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट चालला नाही, पण माझ्यात ती क्षमता आहे असा विश्वास मात्र वडिलांना बसला".
advertisement
अक्षय खन्नाने बॉर्डर (1997), ताल (1999), दिल चाहता है (2001), हंगामा (2003), LOC कारगिल (2003), हुलचुल (2004) आणि रेस (2008) यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली. फिरोज खान यांच्यासोबतचा एक चित्रपट पुढे फरदीन खानकडे गेला. फरहान अख्तरने व्हॉइस फ्रॉम द स्काय बंद करून डॉन 2 बनवला. तारे ज़मीन परसुद्धा अक्षय करणार होता, पण तो चित्रपट शेवटी आमिर खानने केला. "अमोले गुप्तेने आमिरला सांगितलं, ‘मला ही स्क्रिप्ट अक्षयला ऐकवायची आहे.’ आमिर म्हणाला, ‘मी ऐकल्याशिवाय सुचवणार नाही.’ त्याला ती इतकी आवडली की त्याने स्वतःच चित्रपट करायचं ठरवलं".
advertisement
अक्षयचं बालपण वेगळंच होतं. त्याचे वडील करिअरच्या शिखरावर असताना ओशो आश्रमात सामील होण्यासाठी अमेरिकेला गेले. अक्षय म्हणतो,“बाबा आश्रमात गेले तेव्हा मी पाच वर्षांचा होतो. मला काहीच कळत नव्हतं. पण माझं बालपण सुरक्षित आणि आनंदी होतं. स्वतःच्या आयुष्यासाठी थोडं स्वकेंद्री असणं गरजेचं असतं. तुम्ही आनंदी नसाल, तर इतरांना आनंद देऊ शकत नाही. मला वडिलांची खूप आठवण यायची, पण तरीही माझं बालपण सुरक्षित होतं. मला ओशो आवडतात. मी त्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत आणि बरंच वाचलं आहे. माझा त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.”
advertisement
आज अक्षय 50 वर्षांचा असून अविवाहित आहे. करिश्मा कपूरसह काही अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं, पण त्याने कधीच काही मान्य केलं नाही.“प्रेम खूप महत्त्वाचं आहे,” असं तो सिमी गरेवाल यांना म्हणाला. "माझ्या आयुष्यात कोणी असावं असं मला वाटतं, पण सध्या नाही. मला जिवंतपणा असलेली माणसं आवडतात. कदाचित मला दुखावलं जाण्याची भीती आहे. 30 वर्षांनंतरही तसंच प्रेम राहील, हे तुम्ही कसं सांगू शकता?”. मी लग्नासाठी योग्य नाही. लग्न सगळं बदलून टाकतं. मला माझ्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवं आहे".









