Marathwada Rains : मराठवाड्यात इतका मुसळधार पाऊस का झाला, आणखी किती दिवस मुक्काम?
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Marathwada Rain Updates : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात सतत मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. शेतशिवार पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी पिकांची काढणी थांबली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पुणे : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात सतत मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. शेतशिवार पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी पिकांची काढणी थांबली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अजूनही जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला असून शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमागे दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत जे. कोस्टल आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रभाव पश्चिमेकडे सरकताना मराठवाडा व मध्यमहाराष्ट्र भागावर दिसून येतो. या दाब प्रणालीमुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत असून मुसळधार पावसाला सुरुवात होते. २५ सप्टेंबरला पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे २६ सप्टेंबरपासून मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार आहे.
advertisement
हवामान विभागाने सांगितलेली स्थिती किमान ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रात अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून येते. कोकण-गोवा विभागात १२ टक्के, मध्यमहाराष्ट्रात १४ टक्के, विदर्भात ८ टक्के तर मराठवाड्यात तब्बल २६ टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला तरी २०१९, २०२१, २०२२ आणि २०२३ या वर्षांत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्याच्या अतिवृष्टीकडे विक्रमी पाऊस म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असे डॉ. सानप यांनी स्पष्ट केले.
advertisement
सध्या मराठवाड्यातील काही भागांत खूपच जास्त पाणी साचल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिकांची काढणी अशक्य झाली आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस तुलनेने कमी आहे, तिथे शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर पिकांची कामे पूर्ण करून घ्यावी, असे हवामान खात्याने सुचवले आहे. तसेच शेतात साचलेले पाणी तातडीने बाहेर काढणे, निचरा व्यवस्था सुधारून घेणे आणि कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक रस्ते बंद झाले आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे.
advertisement
काही गावांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाला आहे. नद्यांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.मराठवाड्यातील शेतकरी आधीच निसर्गावर अवलंबून असतात. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी अशा टोकाच्या हवामान बदलामुळे त्यांच्या कष्टावर पाणी फिरते. यंदाच्या पावसाने पुन्हा एकदा शेती आणि शेतकरी संकटात ढकलले आहेत. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचं आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Sep 24, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Marathwada Rains : मराठवाड्यात इतका मुसळधार पाऊस का झाला, आणखी किती दिवस मुक्काम?







