Pune News : आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा आधार बनला परभणीचा तरुण, लाखो रूपयांची नोकरी सोडून करतोय समाजसेवा
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
परभणी जिल्ह्यातील आयटी इंजिनिअर करणाऱ्या 26 व्या वर्षीय तरुणाने लाखो रूपये पगार असलेली नोकरी सोडून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे मायबाप होण्याचा निर्णय घेतला. तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ केला जातो.
पुणे: महाराष्ट्रात अनेक शेतकरी कर्जबाजारीपणा, नापिकी आणि सतत होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्या करतात. एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्या कुटुंबावर काय वेळ येते हे शब्दात मांडण्याच्या आणि सांगण्याच्या पलीकडचं आहे. आपल्याकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या की हळहळ व्यक्त केली जाते. आणि हा प्रश्न फक्त सरकारवर सोडून दिला जातो. मात्र काही व्यक्ती अशाही असतात, ज्या फक्त हळहळ व्यक्त न करता या सगळ्यावर कृती करतात आणि त्या कुटुंबांचा आधार बनतात.परभणी जिल्ह्यातील एक उच्चशिक्षित आयटी तरुण, ज्याला महिन्याला दोन लाख रुपयांची नोकरी होती, पण त्याने ती नोकरी सोडली आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा मायबाप बनला. आज आपण त्याच्या या कार्याविषयी जाणून घेणार आहोत.
IT मधील तरूणांना आता एसबीआयमध्ये काम करण्याची संधी, घसघशीत मिळणार पगार
परभणी जिल्ह्यातील आयटी इंजिनिअर अशोक देशमाने यांनी अवघ्या 26 व्या वर्षी दोन लाख रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे मायबाप होण्याचा निर्णय घेतला.2015 साली त्यांनी ‘स्नेहवन’ या संस्थेची स्थापना केली. येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ केला जातो. शिक्षणापासून ते राहण्यापर्यंत सर्व काही या ठिकाणी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. दोन खोल्यांमध्ये 18 मुलांना घेऊन लावलेले हे स्नेहवनचे रोपट आज 180 मुलांना मायेची सावली देत आहे.आळंदीपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर वडगाव घेनंद रोडवर ही ‘स्नेहवन’ संस्था आहे.
advertisement
मुलांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न
स्नेहवन संस्थेत अशा सोयी-सुविधा आहेत की एखाद्या आंतरराष्ट्रीय शाळेलाही लाजवतील. येथे शिक्षणाबरोबरच मुलांना ज्या गोष्टीत आवड आहे त्या क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाते. एखाद्या मुलाला शेतीची आवड असेल तर त्याला प्रत्यक्षात शेती कशी करायची हे शिकवले जाते. तर एखाद्याला संगणकाची आवड असल्यास त्याला संगणकासंबंधी सर्व आवश्यक ज्ञान दिले जाते. परदेशातील अनेक तरुण - तरुणी स्नेहवनमध्ये शिकवायला येतात.शाळेव्यतिरिक्त मल्लखांब, बुद्धिबळासह योगा, संगीत, कथक नृत्य, पाककला, शेती, दूध उत्पादन असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. तसेच, अकाउंटिंग, प्रशासन, व्यवस्थापन आणि संभाषण याचे धडेही तज्ज्ञांकडून मुलांना दिले जातात.
advertisement
दोन खोल्यांमध्ये सुरू झालेला स्नेहवन आता दोन एकर परिसरात विस्तारलेला आहे. सुरुवातीला केवळ पत्र्याच्या छपराखाली असलेल्या छोट्या इमारतीतून सुरुवात झालेली ही संस्था आज तीन नवीन इमारतींसह उभी आहे. संस्थेच्या आवारात वाचनालय, प्रयोगशाळा, गोशाळा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच नाही, तर वंचित मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारीदेखील स्नेहवनने स्वीकारली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 13, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा आधार बनला परभणीचा तरुण, लाखो रूपयांची नोकरी सोडून करतोय समाजसेवा








