झाडू जिथं फिरतो, तिथं लक्ष्मी वास करते! मग तीच ‘लक्ष्मी’ दुर्लक्षित का? व्यथा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील, Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
पिंपरी-चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवला. या यशाचे खरे हिरो म्हणजे स्वच्छता व ड्रेनेज कामगार आहेत. मात्र, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
पिंपरी : आपल्याकडे अशी मान्यता आहे की झाडू जिथे फिरतो, तिथे लक्ष्मी वास करते, असं असूनही स्वच्छता कामगार दुर्लक्षित का राहतात? एखाद्या नेत्याने स्वच्छता मोहीम हाती घेतली, तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र झळकतात. पण, दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कामगारांना तो सन्मान बहुधा मिळत नाही. अशीच काहीशी स्थिती देशातील सातव्या क्रमांकाचं आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील स्वच्छता कामगारांची देखील आहे. लोकल18 सोबत बोलताना त्यांनी अडचणी, मेहनत आणि होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल सांगितलं.
पिंपरी-चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे महानगरपालिका स्वतःची पाठ थोपटत असली, तरी खरे हिरो म्हणजे स्वच्छता व ड्रेनेज कामगार आहेत. कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. ड्रेनेज साफ करताना अनेक वेळा मृत्यूच्या घटनाही घडतात. या स्वच्छता कामगारांनी काही मागण्या मांडल्या आहेत, आणि त्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
advertisement
Pune News: पुणे देशात अव्वल! CPCB चा अहवाल समोर, प्लास्टिक व्यवस्थापनात 99 टक्के गुण, कसं मिळालं यश?
स्वच्छता कामगार आशा खंडाळे यांनी सांगितले की, “स्वच्छता कामगारांसाठी उपलब्ध कोठीमध्येही अनेक असुविधा आहेत. कोठीची पत्रे गळतात, त्यामुळे पावसाचे पाणी आत येते, फॅन चालू नाहीत, स्वच्छतागृह खराब झालेले आहेत, पाण्याची सोय नाही, आणि बाहेर कामावर गेल्यावर बाथरूमची सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी काम केल्यानंतर हात धुण्यासाठी पाणी सुद्धा नसतं.”
advertisement
“काही नागरिक ओला आणि सुका कचरा एकत्र देतात, अनेक महिला सॅनिटरी पॅड पॅक न करता टाकतात. अशा अनेक अडचणींचा सामना स्वच्छता कामगारांना दररोज करावा लागतो,” असे खंडाळे सांगतात. दरम्यान, स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. जो मान-सन्मान मिळायला हवा तो त्यांना कधीच मिळत नाही. नेतेमंडळी किंवा काही हौशी मंडळी ‘स्वच्छ भारत अभियान’ आमच्यामुळे पुढे जात आहे, असं कितीही ओरडून सांगत असले, तरी स्वच्छतेचे खरे हिरो स्वच्छता कामगारच आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 26, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
झाडू जिथं फिरतो, तिथं लक्ष्मी वास करते! मग तीच ‘लक्ष्मी’ दुर्लक्षित का? व्यथा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील, Video








